
गोंदिया,दि.१८ : तिरोडा शहरापासून १५ ते २० किमी अंतरावर नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्प असून, हा परिसर बफर क्षेत्रात येतो. या परिसरातील बुचाटोला बीटमधील गौरीदेव नाला परिसरात गेल्या काही दिवसांपासून काही जण अवैध उत्खनन करून माती वाहून नेत आहेत.त्यातच विशेष म्हणजे मातीचे उत्खनन केलेल्या ठिकाणी पूजा अर्चा करुन त्याठिकाणची सुमारे ५० पोती माती चारचाकी वाहनाने व दुचाकीने वनरक्षक खरोले हे नेत असताना वनमजूर फायरसेप्टी म्हणून काम करणारे वनमजूर शामदेव जगणे यांनी वनरक्षक खरोले यांनी पकडून फोटो काढले.त्यानंतर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक श्री गौडा व साकोली येथील उपसंचालक पवन जेब यांनी मोबाईलद्वारे माहिती दिली.माहिती मिळताच व्याघ्र प्रकल्पाच्या मोबाईल स्काॅटने घटनास्थळावर भेट देत पाहणीही केली,त्यात बफर क्षेत्रात उत्खनन झाल्याचे व त्याबाबतची तक्रार व पुरावे देऊनही अद्यापही संबधित विभागाने कारवाई न केल्याने शंकाना उधाण आले आहे.
तिरोडा तालुक्यातील मंगेझरी गेटपासून तीन किमी अंतरावर कोडोबरा हे गाव आहे. त्यानंतर गौरीशंकर नाला लागतो. कोडोबारा व गौरीशंकर नाल्यापासून हा बीट व जंगल ११३.११४ हे बीट आहे. या परिसरातील क्षेत्रात काहीजण पूजा अर्चा करून मातीचे उत्खनन करून नेत आहेत. विशेष म्हणजे या प्रकाराची वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. पण, याची दखल घेण्यात आली नाही. हे बफर क्षेत्र असल्याने या परिसरात कुठलेच उत्खनन करता येत नाही. मग उत्खनन करून माती नेताना संबंधितावर कारवाई करण्याचे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.सोबतच पुरावे दिल्यानंतरही चौकशी होत नसल्याने संबधित विभाग संबधित वनरक्षकाचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप वनमजूर शामदेव जगणे यांनी केला आहे.
चौकशी करून त्वरीत कारवाई करा नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बुचाटोला बीटमधून अवैध मातीचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात आहे. या प्रकाराची वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.