महाराष्ट्रात ३४ तर मध्यप्रदेशात ४८ सारस पक्ष्यांची नोंद

0
47

गोंदिया जिल्ह्यात २ ने वाढली सारस पक्ष्यांची संख्या, यावर्षी 30 पक्ष्यांची नोंद,

गोंदिया, दि.18 :२०२५ च्या वार्षिक सारस पक्षी गणनेनुसार, महाराष्ट्र राज्यातील सारस पक्ष्यांची संख्या ३४ एवढी नोंदविण्यात आली आहे. ही गणना विशेषतः गोंदिया व भंडारा जिल्ह्यांमध्ये, तसेच त्यांच्यालगतच्या सीमा भागांमध्ये करण्यात आली आहे.१५ व १६ जून  रोजी भंडारा व गोंदिया वनविभाग व सेवा संस्थानसह जिल्ह्यातील विविध अशासकीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सारस पक्षी प्रगणनेचे आयोजन करण्यात आले होते.तर शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात ४८ सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

बाघ व वैनगंगा नद्या महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अनुक्रमे गोंदिया व बालाघाट जिल्ह्यांना विभागणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. भौगोलिकदृष्ट्या या नद्यांच्या दोन्ही तीरांवरील परिसरांमध्ये समान हवामान, जमीन प्रकार आणि शेती पद्धतीमुळे जैवविविधतेत अनेक साम्ये आढळतात. या परिसंस्थात्मक साम्यामुळे काही सारस पक्ष्यांचे जोडपे अधिवास आणि अन्नसंधानासाठी या दोन्ही प्रदेशांमध्ये मुक्तपणे संचार करताना आढळतात. यामध्ये विशेषतः प्रजनन काळात किंवा विश्रांतीसाठी दोन्ही बाजूंच्या शेतक्षेत्रांचा वापर होत असल्याचे निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.न्यायालयाच्या निर्देशानंतर गोंदिया व भंडारा जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सारस पक्ष्यांचे अधिवास असलेल्या गोंदिया, तिरोडा व आमगाव तालुक्यांतर्गत एकूण 70 वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यातील अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, शेतकरी व गोंदिया वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही गणना सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत केलेली असून सारस पक्षी प्रगणनेमध्ये एकूण 30 सारस पक्ष्यांची नोंद झालेली आहे.सारस पक्ष्यांची प्रगणना करण्यासाठी एकूण ३५ चमू तयार करण्यात आले होते. प्रत्येक चमूमध्ये स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, स्थानिक प्रतिनिधी/शेतकरी, वन विभागातील वनपाल, वनरक्षक असे एकूण २ ते ४ व्यक्ती असे १४०-१५० सदस्यांनी या नोंदणीत सहभाग घेतला.सारस पक्षी प्रगणनेकरीता गोंदिया जिल्ह्यातील सेवा संस्था व इतर अशासकीय संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, शेतकरी तसेच गोंदिया,भंडारा व बालाघाट वनविभागातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून सारस पक्ष्यांचे अधिवास असलेले पाणथळ जागा, नद्या, शेतांमध्ये, तलावांजवळ जाऊन पाहणी करुन सारस पक्ष्यांची प्रगणना केली.
महाराष्ट्र मध्यप्रदेश सारस गणना २०२५
गोंदिया जिला – ३०
बालाघाट जिला – ४८
भंडारा जिला – ०४
महाराष्ट्र मध्यप्रदेश सारस गणना 20२४
गोंदिया- २८
भंडारा- ४५
बालाघाट-०३
महाराष्ट्र मध्यप्रदेश सारस गणना 2023
गोंदिया – 31
बालाघाट – 49
भंडारा – 04
महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्य सारस संख्या 2022
गोंदिया- ३४
बालाघाट– ४५
भंडारा – 0३
महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्य सारस संख्या 2021
बालाघाट : ४७
गोंदिया : ३९
भंडारा : ०२
महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्य सारस संख्या 2020
गोंदिया- 45
बालाघाट- 56
भंडारा- 02
चंद्रपूर -01


सारस पक्ष्यांचे अधिवास क्षेत्राचे प्रमाण केवळ घटतच नाही, तर त्याची गुणवत्ता (नैसर्गिक सुसंगतता) देखील दिवसेंदिवस खालावत आहे. ही बाब सारस पक्ष्यांच्या प्रजनन यशात थेट अडथळा निर्माण करणारी असून, येत्या काळात याचे गंभीर परिणाम जैवविविधतेवर व संपूर्ण पर्यावरण तंत्रावर दिसून येण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये सारस पक्ष्यांची ६ घरटी तयार झालेली होती पण मानवी हस्तक्षेप किंवा पर्यावरणीय बदलामुळे ४ घरट्यांमधील अंडी खराब झाली होती.
या पार्श्वभूमीवर, सारस पक्ष्यांचे विद्यमान अधिवास क्षेत्र तातडीने संरक्षित करणे, त्याचे पुनरुज्जीवन (restoration) करणे आणि नव्या संरक्षण क्षेत्रांची योजना आखणे ही काळाची गरज आहे. केवळ निरीक्षण पुरेसे नसून प्रभावी कार्यवाही, धोरणात्मक नियोजन व स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग समन्वय आवश्यक आहे.
सारस गणनेच्या संपूर्ण मोहिमेमध्ये प्रमोदकुमार पंचभाई, उपवनसंरक्षक वनविभाग गोंदिया, सावन बहेकार, अध्यक्ष सेवा संस्था,योगेंद्र सिंह, सहाय्यक वनसंरक्षक, वनविभाग गोंदिया,सचिन डोंगरवार, सहायक वनसंरक्षक वनविभाग गोंदिया,दिलीप कौशिक, वनपरिक्षेत्र अधिकारी गोंदिया,रवीकमल भगत, वनपरिक्षेत्र अधिकारी तिरोडा,सचिन धात्रक, वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर देवरी, श्रीमती अभिलाषा सोनटक्के, वनपरिक्षेत्र अधिकारी आमगाव यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले आणि समस्त वनकर्मचाऱ्यांचे व अन्य स्वंयसेवी संस्थाचे सहकार्य लाभले. गणना दरम्यान दोन दिवस नदी घाट परिसरात (सारस पक्षी विश्रांती स्थळांजवळ) मानवी हालचालींवर मर्यादा घालण्याची विनंती रख भामरे, जिल्हा पोलीस अधीक्षक, गोंदिया यांना करण्यात आली होती. यावर त्यांच्या पोलीस विभागातर्फे महत्वपूर्ण योगदान लाभले.
सेवा संस्थेचे, शशांक लाडेकर, अविजित परिहार, कन्हैया उदापुरे, डिलेश कुसराम, गौरव मटाले, भास्कर कापसे, लोकेश भोयर, चंदू बहेकार, प्रतिक बहेकार, रतिराम क्षीरसागर, राहुल भावे, परमेश्वर पारधी, जिगेश्वर लाडे, अनिरुद्ध तांडेकर, पिंटु वंजारी, दानवीर मस्करे, शेरबहादुर कटरे, शिव भोयर, श्री.रजत नागपुरे, अनिरुद्ध जामरे, हरगोविंद टेंभरे, सोमेश्वर कोल्हे, मिलिंद रामटेके, मनीष ढोमणे, निरज फाये, रीशील डहाके, मुकेश भगत, जैपाल ठाकूर, कमलेश कांमडे, प्रविण मेंढे, बबलू चुटे, कैलाश हेमने, मधु डोये, राकेश डोये, ओमप्रकाश नखाते, जितेंद्र देशमुख, गणेश बावनकर, फरहान सिद्दिकी, संजय डूभरे, ओमकार बहेकर, गौतम श्यामकुवर, संजय पारधी, किशोर उईके, सरगम सोनवाने, अरुण मिश्रा, निरज मिश्रा, अरुण मिश्रा, रिगल गजभिये, योगेश पाथोडे, हिरवळ संस्थेचे रुपेश निम्बार्ते, छत्रपाल चौधरी, दिपक परमार, छत्रपाल सहारे , पंकज नंदनवार, रोहित सोनवाने, रजत चतुर्वेदी, पियुष जैन, अरविंद गजभिये बीएनएचसचे मुकुंद धुर्वे यांचा सहभाग होता.