
तिरोडादि.१९:: विदर्भातील शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करताना आमदार विजय रहांगडाले यांनी राज्य सरकारकडे आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आधारभूत धान खरेदी केंद्रांचे लक्षांक तातडीने वाढविण्याची मागणी केली आहे.
राज्यातील अनेक भागांत धानाचे उत्पादन वाढले असताना, सध्याचे लक्षांक अपुरे ठरत आहेत. त्यामुळे हजारो शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता असून, त्यांना हमीभावात धान विक्री करता येणार नाही, अशी भीती निर्माण झाली आहे.
“राज्य शासनाने वेळेत योग्य पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होईल,” असे नमूद करत आमदार रहांगडाले यांनी अन्न व नागरी पुरवठा सचिवांकडे निवेदन दिले आहे.
शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या शासकीय दाव्यांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होण्यासाठी, खरेदी केंद्रांचे उद्दिष्ट वाढविणे हा अत्यावश्यक निर्णय आहे, असे त्यांनी म्हटले.
त्याचबरोबर त्यांनी स्थानिक प्रशासनाला देखील शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची खात्री करावी आणि गरज असल्यास अतिरिक्त खरेदी केंद्रे उघडण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली आहे.