अवकाळी पावसाचा महावितरणला 9 कोटींचा फटका

0
13

नागपूरदि. 2४: मे आणि जून महिन्यांत नागपूर जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाने महावितरणला तब्बल 9 कोटी 6लाखांचा जबर फटका दिला आहे. वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने जिल्ह्याची वीज वितरण यंत्रणा अक्षरशः कोलमडून पडली होती. जागोजागी उन्मळून पडलेली झाडे, तुटलेल्या तारा आणि वाकलेले खांब, सखल भागात साचलेले पाणी यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, या कठीण परिस्थितीतही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट करत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५६२ उच्चदाब आणि २,३४४ लघुदाब विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, ३८.३३ किलोमीटर उच्चदाब उपरी वीज वाहिन्या आणि २०५.०१ किलोमीटर लांबीच्या लघुदाब वीज वाहिन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ४ वितरण पेट्या आणि ९ वितरण पॉईंट्स कोसळले असून, १८५ वितरण रोहित्रांना (ट्रान्सफॉर्मर) हानी पोहोचली आहे. तसेच, ५ ठिकाणी सिंगल फेज वीज मीटर आणि २ उपकेंद्रांतील उपकरणांचेही नुकसान झाले आहे. एकूण १५० मीटर उच्चदाब आणि ८० मीटर लघुदाब वाहिन्यांचेही प्रचंड नुकसान झाले असून, यामुळे महावितरणला अंदाजे ९ कोटी ६ लाखांवरचा आर्थिक फटका बसला आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. कोसळलेली वितरण यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. अंधारात अडकलेल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी त्यांनी पावसात आणि वादळातही न थांबता काम केले. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळेच अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य झाले.

जिल्ह्यात झालेल्या या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका मौदा विभागाला बसला आहे. या विभागात वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून, दुरुस्ती कामांसाठी महावितरणला अतिरिक्त मनुष्यबळ आणि संसाधने लावावी लागली.महावितरणने या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी केलेल्या तात्काळ उपाययोजना आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.