
गोंदिया:- जिल्ह्याचे वैभव असलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आपल्यातील जैवविवधतेमुळे राज्यभरातील पर्यटकांना भुरळ पाडत आहे.वाढती वाघांची संख्या, सहजरित्या दिसून येणारी वन्यप्राणी उघड्या डोळ्याने पाहण्यासाठी पर्यटकांचा कल नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे दिसून येत आहे.
या व्याघ्र प्रकल्पात जवळपास सर्वच श्रेणीचे वन्यजीव दिसून येत असल्याने पर्यटकही मोठ्या प्रमाणात जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा यामध्ये २० टक्क्याने वाढ झाली आहे.मागील वर्षी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात १५ हजार पर्यटकांनी भेट दिली होती. तर यावर्षी तीन महिन्यात १७ हजार ३३२ पर्यटकांनी भेट दिली आहे. गेल्या वर्षी ३१ लाख ६० हजार रुपयाचे महसूल तर यंदा ४२ लाख १७ हजार रूपयाचा महसूल विभागाने गोळा केला आहे.
जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प जैवविविधता आणि सर्वच श्रेणीच्या वन्यप्राण्यांचे अधिवास असल्याने राज्यासह देशात ओळखला जातो. ताडोबानंतर येथे वाघाचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांची गर्दी असते. त्याचबरोबर विविध प्रजाती पशु-पक्षी येथे दिसून येतात. यामुळे जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी राज्यभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात. यंदाही पर्यटकांनी मनसोक्त आनंद लुटला आहे.विशेष म्हणजे, नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्प १ जुलै २०२४ पासून पर्यटकांकरिता बंद कण्यातर आला आहे.
पर्यटनाला सुगीचे दिवस
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला सुगीचे दिवस आले आहेत. वाढती वाघांची संख्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. यासाठी शासनानेही पाऊल टाकले असून मागील काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यातून तीन वाघ आणून या ठिकाणी सोडण्यात आले आहे. तर दुसरीकडे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात टी-३ या वाघिणीला बछडे झाल्याने येथील वाघांची संख्या वाढली असून पर्यटकांना सहजरित्या व्याघ्र दर्शन होत असते.