
गोंदिया,दि.14- जिल्ह्यातील अनेक गावांना पुराणे वेढा घातल्याने अनेक गावांचा संपर्क तुटून शेतकर्यांचा उभ्या पिकाची नासाडी झाली आहे. जिल्ह्यात एवढे मोठे संकट ओढवले असतानाही पालकमंत्री जिल्ह्यात येऊनही शेतकर्यांच्या बांधापर्यंत जाऊ शकत नाही, हे शेतकर्यांप्रति त्यांची उदासीनता दाखवत असून त्यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांचा अपेक्षाभंग केला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचा या दौऱ्याचा आपण निषेध करीत असून पुढील वेळेस शेतकर्यांचा अपेक्षाभंग केला तर शेतकर्यांसह पालकमंत्र्यांना घेराव घालू, असा इशारा भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. जिल्हय़ाचे पालकमंत्री व राज्याचे गृहमंत्री असलेले ना. अनिल देशमुख हे 13 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर होते. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग थैमान घातले असून जिल्हय़ात पूर परिस्थिती ही बिकट झाली होती. राज्याचे गृहमंत्री या नात्याने मंत्रिमंडळात त्यांचे वजन आहे. त्यामुळे जिल्ह्याला त्याचा फायदा होईल अशी आशा होती. मात्र पालकमंत्री सायंकाळी जिल्हय़ात दाखल होऊन अंधारात आढावा घेऊन पहाटे पहाटे परतले. त्यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यांनी त्याचा अपेक्षाभंग केल्याचे जाणवत आहे. पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राची चमू जिल्ह्यात येऊन गेली मात्र पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील शेतकर्यांशी काही देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपण या दौऱ्याचा निषेध करीत असून पालकमंत्र्यांचे जिल्हय़ातील शेतकर्यांप्रति असेच धोरण असेल तर पुढील दौऱ्याच्या वेळी आपण शेतकर्यांसह त्यांना घेराव घालून याचा जाब विचारणार असल्याचा इशारा भाजप जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष संजय टेंभरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.





