33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

0
51

वाशिम, दि. ०७  : आदिवासी विकास विभागाकडुन अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात परदेशात विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आले आहेत. तरी शिष्यवृत्तीचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्र प्रमाणित प्रती एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालयात १० ऑक्टोबर २०२० पर्यंत सादर करावा, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

अनुसूचित जमातीच्या एकूण १० विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी, अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल. तथापि, १० विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विदयार्थांचे अर्ज प्राप्त झाल्यास इयत्ता १२ वी व पदवी अभ्यासक्रमात मिळविलेल्या गुणांच्या आधारे प्राधान्य देण्यात येईल. शिष्यवृत्तीसाठी संख्या निश्चित केली असली तरी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. तथापि, असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

उमेदवाराची निवड करतांना भूमिहीन आदिवासी कुटुंबातील विद्यार्थी, दुर्गम भागातील विद्यार्थी तसेच आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्यासंबधी अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे वय १ जून २०२० रोजी जास्तीत जास्त ३५ वर्षांपर्यंत असावे. तथापि, नोकरी करीत असल्यास उच्च वयोमर्यादा ही ४० वर्षांपर्यंत राहील..परंतु, नोकरीत नसल्यास विद्यार्थ्यास निवडीची वेळी प्राधान्य देण्यात येईल.

विद्यार्थ्यास परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठात प्रथम वर्षाकरीता प्रवेश मिळालेला असावा. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त ६ लाख रुपये पेक्षा जास्त नसावे. सक्षम अधिकाऱ्याचे वार्षिक उत्पनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थी कोणत्या दिनांकास व कोणत्या विमानाने परदेशात जाणार आहे याची  माहिती आयुक्तालयास दिल्याशिवाय त्याला परदेशात जाता येणार नाही. सदर शिष्यवृत्ती आदिवासी कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस आणि एकाच अभ्यासक्रंमास अनुज्ञेय राहिल. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याने निवडलेला अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास, अभ्यासक्रमासाठी शासनामार्फत खर्च करण्यात आलेली संपुर्ण रक्कम वसूल करण्यात येईल. तसेच सदर अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर भारतात परत येणे किंवा किमान ५ वर्ष भारतात सेवा करणे बंधनकारक राहिल. या अटी मान्य असल्याचे लेखी हमीपत्र (बॉण्ड) दोन जामीनदारासह सादर करावा लागेल.

परदेशात अभ्यासक्रमासाठी एकदा निश्चित केलेला कालावधी वाढवता येणार नाही. शिष्यवृत्तीस मंजुरी घेते वेळी जो अभ्यासक्रम निवडला आहे, त्यात बदल करता येणार नाही. विद्यार्थ्याने निवडलेला अभ्यासक्रम व त्याचा कालावधी अर्जात स्पष्टपणे नमुद करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम संपल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने त्वरीत भारतात येवून त्याचे अंतिम परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र आयुक्त, आदिवासी विकास नाशिक यांना सादर करणे आवश्यक राहील. याशिवाय सध्या करीत असलेल्या व्यवसायाची माहिती द्यावी. नोकरीत असलेल्या विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीसाठी सादर करावयाचा अर्ज त्याच्या नियोक्तयामार्फत सादर करणे बंधनकारक राहिल.

परदेशात ज्या विद्यापीठात विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला आहे, त्या विद्यापीठास व संस्थेस ऑनलाईन प्रणालीद्वारे थेट खात्यावर ट्युशन फी जमा करण्यात येईल. तथापि, विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यास, परदेशातील निवास हा अभ्यासक्रमाचा कालावधी पलीकडे कोणत्याही परिस्थितीत वाढविता येणार नाही. संबधीत विद्यार्थ्याने अगोदरच्या वर्षाचे गुणपत्रक, विद्यापीठ फी व निवास फी अदा केल्याबाबत प्रमाणित प्रत दिल्यानंतरच पुढिल वर्षाची शिष्यवृत्ती आयुक्त, आदिवासी विकास हे मंजूर करतील.  पारपत्र (व्हिजा) प्राप्त करण्याची जबाबदारी संबधीत विदयार्थ्याची राहिल. यासाठी राज्य अथवा केंद्र शासनाचे अर्थसहाय्य मंजुर होणार नाही.

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याने अर्जासोबत चुकीची माहिती अथवा खोटे कागदपत्र सादर केल्याचे आढळून आल्यास शिष्यवृत्तीपोटी शासनाने केलेला संपूर्ण खर्च शेकडा १५ टक्के व्याजासह वसूल करण्यात येईल. तसेच सदर विद्यार्थ्याचे नाव काळया यादीत टाकण्यात येईल. परदेशी विदयापिठामध्ये ‘जीआरई’च्या आधारावर प्रवेश घेणाऱ्या व टीओएफईएल/आयईएलटीएस उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष विचार करण्यात येईल. ज्या परदेशी विद्यापीठाचे जागतिक रँकिंग ३०० पर्यंत आहे, अशाच विद्यापीठात प्रवेश मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील. मात्र निवड मेरीटनुसार होईल.

विद्यार्थ्यास शिक्षण फी, परीक्षा फी, निर्वाह भत्ता (निवास व भोजन) शैक्षणिक कॉन्टेजन्सी चार्जेस हे लाभ दिले जातील. नोकरीत असलेल्या विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीसाठी नियोक्त्यामार्फत अर्ज सादर करावा लागेल. परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे त्या विद्यापीठाचे पत्र व संबधित विद्यापीठाचे प्रॉस्पेक्टसची प्रत, अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्कासह येणाऱ्या एकुण खर्चाचे संस्थेचे प्रमाणपत्र, अभ्यासक्रमाशी संबंधित शाखेतील, विभागातील शिफारस पत्र सादर करावे लागेल. शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणेसाठी विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला या कार्यालयात कार्यालयीत वेळेत विनामुल्य उपलब्ध आहे.

अभ्यासक्रमाचे नाव, स्तर व एकूण संख्या –

एमबीए : पदव्युत्तर स्तरासाठी २ विद्यार्थी,

वैद्यकीय अभ्यासक्रम : पदवीसाठी एक व पदव्युत्तरसाठी एक असे एकूण २ विद्यार्थी.

बीटेक (अभियांत्रिकी) : पदवी स्तराकरीता एक व पदव्युत्तर स्तरासाठी एक असे २ विद्यार्थी,

विज्ञान : पदव्युत्तर स्तर १ विद्यार्थी,

कृषि : पदव्युत्तर स्तर १  विद्यार्थी,

इतर विषय : पदव्युत्तर स्तराकरीता दोन विद्यार्थ्यांना

अशाप्रकारे १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.

blank