बुलडाणा,दि. 30 : खडकपूर्णा प्रकल्प पुर्ण होवून महत्तम क्षमतेने सिंचन होत आहे. खडकपूर्णा प्रकल्पातंर्गत काही गावांचे पुनर्वसन करण्यात आले. प्रकल्पातंर्गत पुनर्वसन केलेल्या दे. राजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण, सिनगांव जहांगीर, सुलतानपूर, मंडपगांव, गारखेड व चिखली तालुक्यातील इसरूळ या गावांमध्ये अंतर्गत रस्ते व अन्य दर्जेदार नागरी सुविधांची आवश्यकता आहे. तरी यंत्रणांनी या पुनर्वसित गावात दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.
दे. राजा येथील खडकपूर्णा प्रकल्प कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाच्या आवारात खडकपूर्णा प्रकल्प पुर्नवसित गावांचे प्रश्न, भूसंपादनाची प्रकरणे आदींबाबत आढावा बैठकीचे आयोजन 27 ऑक्टोंबर रोजी केले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. दळवी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अनिल माचेवाड, कार्यकारी अभियंता प्रशांत संत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नलावडे, तहसीलदार सारीका भगत, सिं. राजा तहसिलदार सुनील सावंत, गटविकास अधिकारी श्री. कांबळे, तालुका कृषि अधिकारी श्री. म्हसाळकर, श्री राठोड आदी उपस्थित होते.
शेतीचे शेतरस्ते अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, या गावांमधील अपूर्ण असलेले शेतरस्ते पुर्ण करावेत. शेतरस्त्यांच्या अभावी शेतकऱ्यांना शेतीची मशागत करणे अवघड जाते. त्यामुळे शेतरस्त्यांची कामे तातडीने पुर्ण करावीत. खडकपूर्णा प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा मोबदला राहीला असल्यास देण्यात यावा. तसेच वाढीव मोबदला व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी यांचे न्यायालयात प्रलंबित असलेले भूसंपादनाचे प्रकरणे, घरांचे अनुदान प्रकरणे व फळबागांचे प्रकरणे याबाबत तातडीने कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे या गावांमधील विद्युत वाहिन्या, रोहीत्र, कृषी वीज जोडण्यांसाठी वाहिनी आदींचे प्रश्न निकाली काढावेत.
ते पुढे म्हणाले, या गावांधील राहीलेल्या प्लॉटचे वाटप करण्यात यावे. तसेच या गावांमधील पाणी पुरवठ्याच्या सुविधा आणी पाईप लाईनचे कामे पुर्ण करण्यात यावीत. प्रत्येक गावात पाणी पुरवठ्याच्या सुविधा दर्जेदार असाव्यात. नागरीकांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा. फळबाग योजनांचा लाभ या गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी दिल्या. याप्रसंगी संबंधीत गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.