
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)ः– कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज (10 जानेवारी) 46वा दिवस आहे. दरम्यान, हरियाणातील करनालमध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या रॅलीचा विरोध केल्यामुळे मोठा गोंधळ झाला. यावेळी पोलिस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. हा गोंधळ इतका वाढला की, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुर आणि वॉटर कॅननचा मारा करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर करनालच्या कॅमला गावात शेतकरी महापंचायत रॅली करणार होते. यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला होता. या ठिकाणच्या गडी सुल्तानजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी पुढे जात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले आणि यामुळे गोंधळ झाला. पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला. या गोंधळादरम्यान शेतकरी हेलीपॅड आणि रॅली ठिकाणापर्यंत पोहोचले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष ओम प्रकाश धनखड यांच्यासोबतच आंदोलकांची बाचाबाची झाली. यानंतर खराब वातावरणाचे कारण सांगून मुख्यमंत्र्यांनी रॅली रद्द केली.
दिल्लीत शेतकऱ्यांची बैठक
दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा संयुक्त मोर्चा एक महत्वाची बैठक घेणार आहे. बैठकीत पुढील रणनितीवर चर्चा होईल. तसेच, शेतकरी 26 जानेवारीलो होणाऱ्या कार्यक्रमाबाबत घोषणा करू शकतात. दरम्यान, उद्या म्हणजेच 11 जानेवारीला सुप्रीम कोर्टात कृषी कायद्याला रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी होईल. यापूर्वी बुधवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटले होते की, स्थितीत कोणताच सुधार नाही. आम्ही शेतकऱ्यांचा भावना समजतो.




