
गोंदिया ता.23-मागच्या दोन महिन्यापासून डीजीआर (सैनिक पुनर्वसन) रद्द करून पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी बिरसी विमानतळातील कामावरून कमी केलेल्या सुरक्षारक्षक आंदोलनाला बसले आहेत. अखेर सुरक्षारक्षकांची मागणी मान्य करून बिरसी विमानतळातून डी जी आर पूर्णतः रद्द करण्यात आले. तशी माहिती केंद्रीय रिसेटलमेंट विभागाकडून संघटनेला पाठवलेल्या ई-मेल पत्रातून देण्यात आली आहे. या विमानतळ प्रकल्पातून आता डी जी आर रद्द झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना सुरक्षारक्षक म्हणून कामावर घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागच्या तेरा वर्षापासून सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांना डीजीआर चा अवलंब करित विमानतळ प्रशासनाने कामावरून पूर्णतः बंद केले होते. आपल्याला पुन्हा कामावरून घेण्यात यावे, म्हणून या सुरक्षा रक्षकांनी मागच्या दोन महिन्यांपासून विमानतळ गेट समोर आपल्या कुटुंबा समवेत आंदोलनाला सुरुवात केली आहे. आपल्याला न्याय मिळावे म्हणून त्यांनी स्थानिक सहघटना पासून तर आमदार, खासदार, तसेच केंद्रीय शासना पर्यंत याचना केली होती. तसेच महामहिम राष्ट्रपती महोदयाकडे शुद्धा इच्छा मृत्यु ची मागणी केली होती हे विशेष. नुकतीच पंतप्रधान कार्यालयाने शुद्धा या आंदोलनाची दखल घेत सदर प्रश्न तात्काळ सोडविण्याची सूचना केली होती. सदर अन्याय ग्रस्त सुरक्षा रक्षकांना न्याय मिळावा म्हणून स्थानिक आमदार विनोद अग्रवाल, खासदार सुनील मेंढे, खासदार प्रफुल पटेल यांनी आपली शक्ती पणाला लावून सदर प्रश्न दिल्ली दरबारी उचलुन धरला होता हे विशेष. त्यांनी घेतलेल्या जनहिताच्या पवित्र्यामुळेच अखेर या विमानतळ प्रकल्पातून डिजीआर कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर सध्या सुरू असलेले डिजीआर प्रायोजित सुरक्षा कंत्राट सुद्धा रद्द करण्यात आले अशी माहिती रिसेटलमेंट विभागाकडून देण्यात आली आहे.
स्थानिक सूरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्यासाठी डिजीआर ची मोठी अडचण होती. विमानतळ प्रशासनाद्वारे सुद्धा याच डिजीआर चा उपयोग करीत स्थानिक नागरिकांवर मोठया प्रमाणात अन्याय करण्यात येत होता. आता या विमानतळ प्रकल्पातून डिजीआर रद्द झाल्यामुळें कामावरून कमी करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाना कामावर परत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता विमानतळ प्रशासन किती दिवसात या कामगारांना पुन्हा कामावर घेतो याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागलेले आहे.
डिजीआर रद्द हि आमच्यासाठी व प्रकल्पबाधित गावासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे.यासाठी आमदार, खासदार तसेच जिल्ह्यातील सर्व संघटना,जिल्हा प्रशासन यांचे आभार.आणि जो पर्यंत आम्हाला पुन्हा कामावर घेण्यात येत नाही तोपर्यंत आमची हि लढाई सुरूच राहणार.पंकज वंजारी ,महासचिव विशाल सुरक्षा कंत्राटी माजदुर संघटना.





