
गोंदिया,दि.29 : केंद्र शासनाचे किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग आजार दूरीकरण करण्याच्या
दृष्टीने केंद्र शासन स्तरावर दरवर्षी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येते. ज्यात वर्षातून एक विशिष्ट
कालावधीत सदर मोहीम राबविण्यात येते. ज्यामध्ये सर्व नागरिकांना एकाच दिवशी हत्तीरोग दूरीकरणाच्या दृष्टीने
डी.ई.सी. व अलबेंडाझोलच्या गोळ्या खाऊ घातल्या जातात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा 1 जुलै ते 15 जुलै 2021
या कालावधीत जिल्ह्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या
एकूण 14 लाख 56 हजार 609 लोकसंख्येपैकी गरोदर माता, अती गंभीर आजारी रुग्ण व दोन वर्षाखालील बालके
वगळता 13 लाख 54 हजार 646 लोकसंख्या निवडण्यात आलेली आहे.
ही मोहीम 1 जुलैपासून सुरु होत असून आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे
काटेकोरपणे पालन करुन गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. सदर गोळया हया वयोगटानुसार वाटप करण्यात
येतात तसेच सदर गोळ्या जेवनानंतरच खायच्या असतात.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत वाटप करण्यात
येणाऱ्या गोळ्यांचे सेवन हे कर्मचाऱ्यांच्या समक्षच खाण्यात यावे, जेणेकरुन शासनाने ठरविल्याप्रमाणे 100 टक्के
लोकांनी गोळ्यांचे सेवन केल्याची खात्री होईल. सदर गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाही. हत्तीरोग आजाराचे
दूरीकरण या शासनाच्या मोहिमेमध्ये जनतेचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.
22 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय
समितीची सभा घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, जिल्हा
हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, आरोग्य विभागातर्फे 1 जुलै पासून सुरु होणाऱ्या सार्वत्रिक हत्तीरोग
औषधोपचार मोहिमेअंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या डी.ई.सी. गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे
नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन करावे असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, आरोग्य विभागातर्फे 1 जुलै पासून सुरु होणाऱ्या सार्वत्रिक
हत्तीरोग औषधोपचार मोहिमेअंतर्गत वितरीत करण्यात येणारे डी.ई.सी. गोळीचा मी स्वत: सर्वांसमक्ष सेवन केलेला
असून सदर डी.ई.सी. गोळीपासून कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही. करीता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी
डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन करावे व आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला 100 टक्के यशस्वी करावे असे
त्यांनी सांगितले.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे म्हणाले, एकदा हत्तीरोग बळावल्यावर उपाय नाही. परंतू
हत्तीरोग होवू नये म्हणून डी.ई.सी. गोळ्यांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा ‘हत्तीरोग’ दिनी अशी सलग 5 वर्षे
खाल्ल्यास हत्तीरोग होत नाही. त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होणे थांबते व पर्यायाने आपण स्वत: व आपली भावी
पिढी हत्तीरोगापासून मुक्त राहू शकेल असे त्यांनी सांगितले.