समृद्ध गाव स्पर्धेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0
22

वाशिम, दि. ३० : जिल्ह्यातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातीली ४३ गावांचा पानी फाऊंडेशनमार्फत आयोजित ‘समृद्ध गाव स्पर्धा’मध्ये समावेश आहे. या गावांमध्ये झालेल्या कामांचा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ३० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या सभेत आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उप वनसंरक्षक सुमंत सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, पानी  फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, कारंजाचे तालुका कृषि अधिकारी संतोष वाळके, सुभाष नानवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, स्पर्धेमध्ये समाविष्ट गावांमध्ये यापुढे वृक्ष लागवड, फळबाग लागवड करण्यावर भर द्यावा. तसेच शेतकऱ्यांना मृद आरोग्याविषयी माहिती देवून त्या अनुषंगाने योग्य मार्गदर्शन करावे. कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेवून गावांमध्ये कृषि मालावर प्रक्रिया करणारे लघु उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

समृद्ध गाव स्पर्धेमध्ये समाविष्ट गावांमध्ये आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी झालेल्या या बैठकीमध्ये श्री. नानवटे यांनी आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती दिली. या स्पर्धेत समाविष्ट गावांमधील नागरिकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये स्पर्धेचे मूल्यमापन कशाप्रकारे होईल, यासह जलव्यवस्थापनसंबंधी माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगिलते.

स्पर्धेत सहभागी झालेल्या २९ गावांना पर्जन्यमापक यंत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. यापैकी कारंजा तालुक्यातील गायवळ व मंगरूळपीर तालुक्यातील जनुना बु. या गावांना आज प्रातिनिधिक स्वरुपात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत आदी मान्यवरांच्या हस्ते पर्जन्यमापक यंत्रांचे वितरण करण्यात आले.