
गडचिरोली,दि.२3–राज्यातील पाच जिल्हापरिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची निवडणूका ५ ऑक्टोंबर रोजी घेण्यात येणार आहे. या जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची निवडणूक ओबीसी संवर्गाशिवाय होऊ घातलेली आहे. या सर्व निवडणुकांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण द्या अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास देशभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही निवेदनातून देण्यात आला.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील महासंघाचे पदाधिकारी तसेच सलंग्नीत व समविचारी संघटनेच्या द्वारे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंचायत राज मंत्री कपिल पाटील, ओबीसी पार्लिमेंट कमिटीचे अध्यक्ष, राजेश वर्मा, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष भगवानलाल सहानी, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांनासंघटनेच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की १९९४ पासून मिळत असलेले ओबीसी संवर्गाचे २७% राजकीय आरक्षण ४ मार्च २०२१ रोजी दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे धोक्यात आलेले आहे. त्यामुळे होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसी संवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, केंद्र सरकार मध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्यात यावा, सरकारी कार्यालयात ओबीसींच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात यावे व ओबीसी कर्मचाऱ्यांना नोकरीत पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे तसेच ओबीसी संवर्गात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत मध्ये ओबीसी संवर्गाला २७% राजकीय आरक्षण देण्यात यावे इत्यादी मागण्या या निवेदनातून करण्यात आले आहे. एक महिन्याच्या आत या मागण्या पूर्ण न केल्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर समविचारी संस्था व संलग्नीत संस्था यांच्या मदतीने देशात तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने देण्यात आला.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष दादाजी चूधरी, कार्याध्यक्ष विनायक बांदूरकर, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सचिव देवानंद कामडी, जिल्हा संघटक सुरेश भांडेकर, कोषाध्यक्ष डॉ.सुरेश लडके, सदस्य दादाजी चापले, गोविंदराव बानबले, शरद ब्राह्मणवाडे, प्रभाकर वासेकर, पुरुषोत्तम मस्के, त्र्यंबक करोडकर, पुरुषोत्तम जंजाळ, चंद्रकांत शिवनकर , अरुण मुनघाटे, एस. टी विधाते, विलास बल्लामवार, किरण चौधरी, ज्योती भोयर मंगला कारेकर, पुष्पा करकाडे, रेखा समर्थ, विलास मस्के, प्रा.अशोक लांजेवार,इत्यादी सह इतर महिला व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.





