
दोनजण गेले वाहून तर एक ट्रक अडकला, एकाचा वीज पडून मृत्यू
बुलडाणा—जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस बरसल्याने बुलडाणा नजीक येळगांव धरणाचे स्वयंचलीत 80 दरवाजे उघडले. त्यामुळे बुलडाणा- चिखली रस्त्यावरील साखळी फाट्यावर दि. 27 च्या मध्यरात्री तसेच दि. 28 सकाळी वाहतुक ठप्प झाली होती. सागवण, रायपूर तसेच धाड येथील नदी व धरणाच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत होते. चिखली तालुक्यातील पेठच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुक ठप्प झाली होती. एक ट्रक या पाण्यात वाहुन पलटी झाला. चालकाच्या सर्तकतेने ट्रक मधून उडी मारल्याने तो बचावला. परंतु त्याच्या सोबत असलेला एक जण वाहुन गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच देऊळगांवराजा तालूक्यातील खडकपुर्णा धरणाचे दरवाजे तिसर्यांदा उघडले. जनजीवन विस्कळीत झाले आहे तर असंख्य गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून काल रात्री पासून गावे अंधारात आहेत.
जिल्ह्यातील पैनगंगा, विश्वगंगा, बाणगंगा, धामना, पेन, कोराडी, यासह छोट्या मोठ्या नद्या व नाल्याना पूर आले आहे. जिल्ह्यातील 7 मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरले धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहेत. 9 ठिकाणी रस्ते बंद झाले असून त्या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे..अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाने लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, तूर पिकांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती विभागाचे पथक टीम सर्व बाबीवर लक्ष ठेवून सतर्क आहे , जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत 3 जण वाहून गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे तसेच या पावसाने ग्रामीण भागातील असंख्य घरांची पडझड झाल्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. अजून दोन दिवस नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे जिल्ह्यातील 9 मंडळात अतिवृष्टी झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले असून खामगाव तालुक्यात एकाच अंगावर वीज पडून मृत्यू झाला तर नाद्राकोळी येथील दोन बाईक स्वार वाहून गेल्याची माहिती सुद्धा उपजिल्हानिवासी अधिकारी दिनेश गीते यांनी दिली आहे.
6 सिंचन प्रकल्प शंभर टक्के
जिल्ह्यातील मोठे व मध्यम असे दहा सिंचन प्रकल्प आहेत. गत दोन दिवसापासून पडणा-या मुसळधार पावसामुळे सहा सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरली आहे. तर उर्वरित चार सिंचन प्रकल्प 75 टक्क्याच्यांवर सिंचन साठवण क्षमता आज रोजी आहे. जिल्हयातील ज्ञानगंगा, कोरोडी, पलढग, मन, तोरणा, उतावळी ही सहा सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरले असून ज्ञानगंगा (75.50%), खडकपूर्णा (90.36%), पेनटाकळी (75.85%) तर मस सिंचन प्रकल्पात (67.74%) जलसाठवण आज रोजी आहेत. यामुळे खरिप हंगामात शेतक-यांना या पाण्याचा उपयोगासोबतच पिण्याच्या पाण्यासाठीही या जलसिंचन साठवणीचा उपयोग होणार आहे.





