
गोंदिया,दि.19 : गडचिरोली पोलिसांनी 13 नोव्हेंबरला चकमकीत मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवाद्यांना ठार केले होते. या प्रकरणी पहिल्यांदाच नक्षलवादी समजल्या जाणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष ( माओवादी )ने अधिकृत रित्या प्रसिद्धीपत्रक काढून निषेध नोंदविला आहे. तसेच 27 नोव्हेंबरला मध्यभारत बंदचे आवाहन केले आहे. भाकप ( माओवादी ) पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य मिलिंद बापूराव तेलतुंबडे सह 26 जणांना गडचिरोली पोलिसांनी मर्दानोला जंगलात झालेल्या भीषण ठार केले. या घटनेचा भाकप ( माओवादी) पक्षाने निषेध व्यक्त करत प्रसिद्धीपत्रकातून मिलिंद तेलतुंबडे ( दीपक ) व त्यांचे बंधू आनंद तेलतुंबडे यांच्यावरील भीमा-कोरेगाव दंगल घडविल्याच्या आरोपाचे खंडण केले आहे.
भाकप माओवादीचा केंद्रीय कमिटी प्रवक्ता अभय याच्या नावे पत्रक जारी केले गेले आहे. मृत दीपक अर्थात मिलिंद तेलतुंबडे याला पत्रकात जनयोद्धा संबोधले आहे. 27 नोव्हेंबर रोजी बंद पाळून मृत नक्षल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सभा आयोजित करण्याचे आवाहन नक्षल्यानी केले आहे.
नक्षल्यांचा बंद महाराष्ट्र- छत्तीसगड- ओडिशा- तेलंगणा-आंध्रप्रदेश राज्यात आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पत्रकात मिलिंद तेलतुंबडे यांनी केलेल्या जंगल आणि शहरी क्षेत्रातील नक्षली आंदोलनाच्या विविध टप्प्यांचा उल्लेख करण्यात आला. 1992 साली मिलिंद पूर्ण नक्षली आंदोलनात सक्रिय झाल्याचे सांगत 2005 मध्ये मिलिंदने कामगार-आदिवासीबहुल चंद्रपुरात सर्वस्तरात नक्षली आंदोलनाला मिळविलेल्या समर्थनाचा उल्लेख केला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना उध्वस्त करणाऱ्या खाणीविरोधात मिलिंदने जनमत एकत्रित केल्याची कबुली पत्रकातून दिली गेली आहे. मिलिंद आणि अन्य नक्षली यांच्या मृत्यूने आंदोलनाची मोठी हानी झाल्याचा उल्लेख पत्रकात असून मोठ्या चकमकीनंतर जारी होणाऱ्या पत्रकात पोलिसांना दोष देण्याची असलेली भाषा ताज्या पत्रात नसल्याने यंत्रणांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या मृत्यूचा नक्षली बदला घेतील हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.





