
गोंदिया, दि. 11 : जिल्हयात कोरोना व ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग कमी होत असल्यामुळे 14 फेब्रुवारीपासून जिल्हयातील इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्षरित्या सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली (दि.09)झालेल्या बैठकीत दिल्याने गोंदिया जिल्ह्यातील इयत्ता 1 ते 7 वी चे वर्ग 14 फेबुवारीपासून सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
जिल्हयात साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार जिल्हयातील विद्यार्थ्यांकरीता नियमीतरित्या शाळा ऑफलाईन पध्दतीने सुरु ठेवणे विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील. या आधीच इयत्ता 9 वी पासुन महाविद्यालयासह शाळा सुरु करण्यात आल्या होत्या, त्यासोबतच आता इयत्ता 1 ली पासुनच्या शाळा 14 फेब्रुवारी 2022 पासुन प्रत्यक्षरित्या सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहे.
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 14 फेब्रुवारीपर्यंत आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यास ताप, सर्दी, खोकला असल्यास शाळेत येण्याबाबतची बंदी घालण्यात येईल. विद्यार्थ्यास शाळेमध्ये येण्याबाबत त्यांचे पालकांचे संमतीपत्र घेणे शाळेला बंधनकारक राहील. पालकांनी संमती नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने शैक्षणिक वर्ग सुरु ठेवण्यात यावे. मैदानावरील खेळ, स्नेह-संमेलने, दैनिक परिपाठ यांसारख्या गर्दीच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी राहील. विद्यार्थ्यांच्या पालकांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने पालकांना प्रोत्साहन देवून जनजागृती करण्यात यावी. शाळा/महाविद्यालये परिसरातील गर्दी टाळण्यासाठी पालकांचा शाळेच्या परिसरातील प्रवेश टाळण्यात यावा. कोविड-19 प्रतिबंधात्मक त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. शाळा/महाविद्यालये परिसरात शालेय कर्मचाऱ्यांसह सर्वांना मास्क वापरण्याची सक्ती करण्यात यावी. विद्यार्थ्यांचे नाक, तोंड नियमित मास्क ने झाकलेले असावे. विदयार्थी मास्क ची अदलाबदल करणार नाहीत याची दक्षता घ्यावी. शालेय परिसराची नियमीत स्वच्छता राखण्यात यावी. वेळोवेळी शाळेचे नियमित निर्जंतुकीकरण करण्यात यावे. विदयार्थ्यांना सुध्दा वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागरुक करण्यात यावे. विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी साबणाने हात धुण्यासाठी स्वंतत्र व्यवस्था करण्यात यावी. विदयार्थ्यांना सोबत पाणी बॉटल आणण्यासाठी प्रोत्साहीत करावे.
कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शाळांमध्ये बायोमॅट्रीक उपस्थितीचा वापर करण्यात येवू नये. विद्यार्थ्यांनी कोणतेही साहित्य जसे की, पुस्तक, पेन, पेन्सील, पाणी बॉटल शाळेत येतांना सोबत आणावे. त्यांची आपसात अदलाबदल करु नये याबाबत दक्षता घ्यावी. एका बाकावर शक्यतो एकच विदयार्थी बसेल याची खबरदारी घ्यावी. तसेच दोन बाकांमध्ये सुरक्षीत अंतर राखण्यात यावे. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व इतर पर्यवेक्षकीय यंत्रणेने शाळांना नियमीत भेटी देवून, निर्देशित नियमानुसार शाळा सुरु असल्याबाबतची वेळोवेळी खात्री करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 मधील कलमानुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल. व संबधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात यईल. हा आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 च्या तरतुदीनुसार लागू करण्यात आला असल्याचे कळविले आहे.





