
· जिल्हाधिकाऱ्यांनी चालविली ई-रिक्षा
भंडारा, दि. 22 : पर्यावरण संवर्धनासाठी माझी वसुंधरा अभियानाचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. आज सकाळी शिवाजी क्रीडा संकुलातून निघालेल्या ई-रिक्षा रॅलीचे सारथ्य जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज केले. त्रिमुर्ती चौक- मुस्लिम लायब्ररी चौक – राजीव गांधी चौक – शितला माता मंदीर – शास्त्री चौक – गांधी चौक-परत शिवाजी क्रीडा संकुलात अशा मार्गावरून निघालेल्या या रॅलीत माविमच्या व महिला बचतगटांचा सक्रिय सहभाग होता. साधारण 110 स्पर्धकांनी ई-बाईक, ई-कार्गो, ई-रिक्षा या ई-वाहनासह रॅलीत सहभाग घेतला होता.
माझी वसुंधरा ही पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ व्हावी. यासाठी सर्व नागरिकांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनात आपला वैयक्तिक सहभाग व सामूहिक सहभाग नोंदवून त्याची अंमलबजावणी करावी. पेट्रोल,डिझेल या पारंपरिक इंधनाचे मर्यादित साठे लक्षात घेता ई-वाहन वापरण्यासाठी नागरिकांनी पूढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कदम यांनी केले.
समारोपाच्या वेळी सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी नगरपरिषद प्रशासन अधिकारी चंदन पाटील, भंडारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, माविमचे समन्वयक प्रदीप काठोळे यासह महिलांनी सक्रिय सहभाग घेतला.
माझी वसुंधरा अभियान 2.0 (2021-22): माझी वसुंधरा अभियान 2.0 ची सुरूवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गेल्या वर्षी जागतिक पर्यावरण दिनादिवशी करण्यात आली होती. या अभियानांतर्गत स्थानिक संस्थांना काम करण्यासाठी 5 जून, 2021 ते दिनांक 31 मार्च, 2022 एवढा कालावधीत मिळणार आहे.





