नागरिकांची मते जाणून घेणार
वाशिम, दि. 25 : जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्राम पंचायती आणि शहरातील नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी. व्हिजेएनटी) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्य शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणाकरीता नागरीकांची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी समर्पित आयोगाचा 28 मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 या वेळेत भेटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
अमरावती येथील समर्पित आयोगाच्या भेटी दरम्यान नागरिकांना वेळेत आपली मते मांडता यावीत आणि निवेदन देता यावीत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम (ग्रामपंचायत निवडणूक शाखा) यांचेकडे आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी म्हणजे 27 मे पर्यंत करावी. असे आयोगाच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. नाव नोंदणी करतांना व्यक्तीचे वा संस्थेचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व असल्यास ई-मेल इत्यादी बाबी नोंदणीदरम्यान द्याव्यात. यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे.