40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राष्ट्रीय उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार;उत्तरकाशीमध्ये ढगफुटी;8 ते 10 कामगार बेपत्ता

उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार;उत्तरकाशीमध्ये ढगफुटी;8 ते 10 कामगार बेपत्ता

0
55

blank

बचावकार्य सुरू

डेहराडून:-उत्तराखंडमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. राज्याच्या उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बांधकामाच्या साईटवरील ८ ते १० कामगार बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली आहे.

यासंदर्भात बडकोटचे पोलिस अधिकारी दीपक कठेत यांनी सांगितले की, यमुनोत्री महामार्गावर ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली होती. पथकाने घटनास्थळी पोहोचल्यावर पाहिले की, येथे रस्त्याच्या आणि इतर कामांमध्ये गुंतलेले काही लोक तंबू टाकून राहत होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेले आहेत. आतापर्यंत ८ ते १० जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. हे सर्व नेपाळी वंशाचे आहेत. तर उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य म्हणाले की, शनिवारी मध्यरात्रीनंतर यमुनोत्री महामार्गावर पालीगाड ओजरी डाबरकोट दरम्यान ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत हॉटेलचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी राहणारे ८ ते १० कामगार बेपत्ता झाले. यमुनोत्री मार्गावरही परिणाम झाला आहे. बेपत्ता मजुरांच्या शोधासाठी प्रशासनाचे पथक आणि एसडीआरएफकडून बचावकार्य सुरू असल्याचे आर्य यांनी सांगितले.

ढगफुटीनंतर यमुनोत्री महामार्ग सिलाई बँडसह अनेक ठिकाणी बंद आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पथक रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न करत आहे. तर, ओझरीजवळचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. शेतांमध्ये ढिगारा साचला आहे. स्यानाचट्टी येथील कुपडा कुंशाला त्रिखिली मोटर पूलही धोक्यात आला आहे. यमुना नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.यमुनोत्री महामार्गावरील स्याना चट्टीजवळ कुपडा कुनसाला मोटर मार्गावरील पुलाजवळ वरून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड आल्याने यमुना नदीचा प्रवाह थांबला आणि येथे तलाव तयार होऊ लागला आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि यमुना नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. आज रविवार पासून पुढील 3 दिवस राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर इतर अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आगामी 1 जुलै पर्यंत राज्यातील डेहरादूनसह टिहरी, पौडी, चंपावत, हरिद्वार, नैनिताल आणि उधमसिंह नगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आल्याचे हवामान विज्ञान केंद्राचे संचालक बिक्रम सिंह यांनी सांगितले.

blank