
तिरोडा : रानभाज्यांचे आहारात वेगळे महत्व आहे. आपल्याला रानभाज्यांची माहिती विस्मृत होत चालली आहे. त्यामुळे आपल्या आहारातून त्या हद्दपार होत असल्याने आपल्या आरोग्याला मिळू शकणारे पोषक घटक मिळत नाही. त्यामुळे आपल्या आपल्या आरोग्यासाठी हितकारक असलेल्या या रानभाज्यांची ओळख घ्यावी. त्यांच्यात असलेले औषधीयुक्त गुणधर्म जाणून घ्यावे. असे सांगून रानभाजी महोत्सवात लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवण्याच्या सूचना तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आ.विजय रहांगडाले यांनी केल्या.
महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून 9 ते 15 ऑगस्टपर्यंत रानभाजी महोत्सव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज 12 ऑगस्ट रोजी तिरोडा तालुक्यात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन पंचायत समिती सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यानंतर जिल्हा परिषद सदस्य चतुर्भुज बिसेन यांनी रानभाजी दिवसेंदिवस आपल्या आहारातून कमी होत चालल्याचे सांगितले. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला रानभाज्याची ओळख नसल्यामुळे व त्याचे महत्त्व माहीत नसल्यामुळे आपण त्यांचे सेवन आपल्या दैनंदिन आहारात करत नाही. त्याकरिता अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करावे, जेणेकरून लोकांना रानभाज्यांची ओळख व त्यांचे औषधी गुणधर्म तसेच आहारातील महत्त्व कळेल, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष भाऊराव कठाने यांनी, शेतकऱ्यांनी रानभाजीच आहारात समावेश करून घ्यावा असे आवाहन केले. यानंतर पंचायत समिती सदस्य वनिता भांडारकर यांनी रानभाजीचे पाककृती व उपलब्ध असलेल्या रानभाज्याविषयी माहिती दिली.





