
गोंदिया : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात मागील 22 ते 25 वर्षांपासून विविध पदावरील 2200 कंत्राटी कर्मचारी जीवाचे रान करीत आहेत. परंतु, वारंवार या कंत्राटी कर्मचार्यांच्या संदर्भात अन्यायकारक निर्णय शासनाकडून घेतले जात आहे. त्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनस संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने देवून पाठपुरावा करण्यात आला. मात्र शासनाने अद्याप कोणतेही सकारात्मक निर्णय घेतले नाही. त्यामुळे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील सर्व कंत्राटी कर्मचार्यांनी आंदोलन सुरू केले असून, जिल्हाधिकार्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.
निवेदनानुसार, सर्व क्षयरोग कंत्राटी कर्मचारी शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी 13 ते 28 सप्टेंबरपर्यंत काळी फीत लावून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तसेचे 29 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन करणार आहेत. तसेच 1 ते 6 ऑक्टोबर 2022 या कालावधीत कामबंद आंदोलन करणार आहेत. त्या अंतर्गत निक्षय डाटा एंट्री बंद करणे, मासिक अहवाल, त्रैमासिक अहवाल, राज्यस्तरीय कार्यालयास एनटीईपी कार्यक्रमासंदर्भात अहवाल सादर न करणे यांचा समावेश आहे. तसेच सदर कर्मचार्यांच्या मागण्या शासन दरबारी मंजूर न झाल्यास 3 ऑक्टोबर 2022 पासून आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
निवेदन देतेवेळी क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचारी भोजेंद्र बोपचे, पवन वासनिक, रामचंद्र लिल्हारे, संजय रेवतकर, संजय भागवतकर, राजू मेश्राम, हरिश चिंधालोरे, रिजवाना शेख, देवेंद्र भाजीपाले, मंजुश्री मेश्राम, अनुप बनसोड, रवी फरदे, दीपक चव्हाण, उर्मिला बघेले, चंद्रकांत भुजाडे, प्रज्ञा कांबळे, पंकज लुतडे, योगिता अडसड, आकाश चुन्ने, रोशन भैसारे, धनेंद्र कटरे, अमित मंडल, दिनेश डोंगरवार, सी.एस. मिश्रा आदि उपस्थित होते.

क्षयरोग कंत्राटी कर्मचार्यांच्या मागण्या…
♦सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागाची सरळ सेवा भरती न राबविता राज्यातील 25 वर्षापासून कार्यरत 2200 क्षयरोग कंत्राटी कर्मचार्यांना सरसकट सेवासमावेशन करण्यात यावे.
♦वेतन सुसूत्रीकरणामध्ये वरिष्ठ कर्मचार्यांना शून्य वेतनवाढ देण्यात आली. हे अन्यायकारक सुसूत्रीकरण रद्द करून जुन्या व वरिष्ठ कर्मचार्यांना वेतनात योग्य वेतनवाढ देण्यात यावी.
♦इंधन भत्ता व प्रवास भत्त्यामध्ये मागील 15 वर्षांपासून कोणतीही वाढ शासनाकडून करण्यात आली नाही. तरी सदर वाढ त्वरित लागू करण्यात यावी.
♦प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत अभियान राबवून देशातून क्षयरोग हद्दपार करण्याची घोषणा केली. परंतु 2025 नंतर क्षयरोग कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचे भवितव्य काय? याची खातरजमा करून देण्यात यावी.
♦राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील टीबीएचव्ही या पदावर कार्यरत कर्मचार्यांवर अन्याय झालेला आहे. वार्षिक आर्थिक कृती आराखड्यामध्ये सुधारणा करून तफावत दूर करण्यात यावी.





