
नवी दिल्ली-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी मुस्लिम बुद्धिजीवी आणि इमामांना भेटण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीला भेट दिली. याच ठिकाणी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे कार्यालय आहे. तेथे भागवत यांनी ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. उमर इलियासी यांची भेट घेऊन चर्चा केली.
मौलाना जमील इलियासींच्या मजारवर फुलेही वाहिली. कोणत्याही मुस्लिम धार्मिक संघटनेच्या प्रमुखांशी सरसंघचालकांची मशिदीत झालेली ही पहिलीच भेट आहे. यानंतर भागवत यांनी उत्तर दिल्लीतील मदरसा ताजवीदुल कुराणचाही दौरा केला आणि मुलांशी संवाद साधला.
Delhi | RSS chief Mohan Bhagwat held a meeting with Dr Imam Umer Ahmed Ilyasi, Chief Imam of All India Imam Organization, at Kasturba Gandhi Marg mosque today pic.twitter.com/vxfo0IPsMa
— ANI (@ANI) September 22, 2022
या भेटीत मदरशामध्ये मुलांशी संवाद साधताना डॉ. उमर म्हणाले, आमचा डीएनए एक असल्याचे भागवत म्हणाले आहेत. केवळ प्रार्थनेच्या पद्धती भिन्न आहेत. भागवत राष्ट्रऋषी आहेत. ते देशाचे राष्ट्रपिता आहेत. एका राष्ट्रपित्याचे येथील आगमन ही आनंदाची बाब आहे. यातून प्रेमाचा संदेश दिला पाहिजे. आम्ही त्यांना निमंत्रित केले म्हणून ते आले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यादरम्यान उमर इलियासी आणि भागवत यांच्यात एक तास बंदद्वार चर्चा झाली.
याच मशिदीत संघटनेचे कार्यालय व इलियासी यांचे निवासस्थानही आहे. भागवत यांच्यासोबत डॉ. कृष्ण गोपाल, मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संस्थापक इंद्रेशकुमार आणि रामलालही होते. संघाचे अखिल प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की, सरसंघचालक सर्वच क्षेत्रांतील लोकांना भेटतात. हा एक सतत सामान्य संवाद प्रक्रियेचा भाग आहे. भागवत यांनी अशातच माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्ट. जनरल जमीर उद्दीन शहा, माजी खासदार शाहिद सिद्दिकी यांचीही भेट घेतली होती.
… अन् भागवत म्हणाले
येथील मदरशामध्ये मोहन भागवत आणि इमाम उमर इलियासी मुलांशी संवाद साधत असताना इलियासी यांनी भागवत यांना राष्ट्रपिता संबोधले. यात मध्येच थांबवून भागवत म्हणाले, देशाचे एकच राष्ट्रपिता आहेत. बाकी सारे भारतमातेची लेकरं आहेत.
ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनची १९७६ मध्ये स्थापना, ५ लाख सदस्य इमामांशी संबंधित मुद्द्यांचे प्रतिनिधित्व करणारी ही संघटना असून १९७६ मध्ये या संघटनेची भारतात स्थापना करण्यात आली. या सर्व इमामांच्या आर्थिक, सामाजिक बाबींसह समाजाच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी उपाययोजना करण्याच्या हेतूने ही संघटना स्थापन झाली. या संघटनेचे देशभर सुमारे ५ लाख सदस्य आहेत.
हा समाजासाठी मोठा संदेश : शोएब
डॉ. जमील इलियासी यांचे पुत्र शोएब यांनी सांगितले की, भागवत यांची ही भेट म्हणजे मोठा संदेश आहे. हा आनंदाचा प्रसंग आहे. प्रेमाचा संदेश आहे. भागवत मशिदीत का आले या चर्चेत पडले नाही पाहिजे. आम्ही त्यांना बोलावले होते, त्यामुळे ते आले.





