जीवती तालुका वनक्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार – सुधीर मुनगंटीवार

0
13

चंद्रपूर दि. २२ : जीवती तालुका वनक्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तालुक्यातील ११ गावातील ८१९५ हेक्टर जमीन वनखंडात समाविष्ट नसून ती जमीन वनक्षेत्रातून बाहेर असल्याची घोषणाही लवकरच करण्यात येणार आहे.

हरिसिंग वनसभागृहात यासंदर्भात झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनबल प्रमुख वाय.एल.पी. राव, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे,  सुदर्शन निमकर, केशव गिरमाजी, महेश देवकाते यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारकडे असा विनंती अर्ज करण्यासाठी सर्व प्रशासकीय तयारी गतीने पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तालुक्याचे उपग्रह सर्वेक्षण मॅपिंग करून घेण्याचे आणि ती अद्यावत माहिती पुढील नियोजनासाठी उपयोगात आणावी तसेच ही सर्व कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.