चंद्रपूर: उन्हाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअसवर गेल्याने शहरासोबत गाव खेड्यात लोकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपणे सुरू केले आहे. व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील विरखल चक येथील महिला गर्मी पासून बचाव करण्यासाठी घराबाहेर खाटेवर झोपली असता मध्यरात्री वाघाने हल्ला करून महिलेला ठार केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे.
सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील विरखल चक येथील महिला श्रीमती मंदबाई एकनाथ सिडाम (५३ )रा. विरखल चक घराबाहेर मच्छर दाणी लावून खाटेवर झोपली होती. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास या महिलेवर वाघाने हल्ला करून फरफटत नेत असताना आरडाओरड झाली आणि घरचे मंडळी जागे होऊन जोरात आरडाओरड केल्याने वाघ हा त्या महिलेला सोडून जंगलात पसार झाला. सदर महिलेचा मात्र जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती सावली वनपरिक्षेत्र व पाथरी पोलिसांना देण्यात आली. ते रात्रीच घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून मृतक महिलेच्या शवविच्छेदन साठी सावली ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वनविभाग तर्फे तात्काळ परिवाराला २५ हजारांची मदत करण्यात आलेली आहे. मात्र वाघाच्या भीती व दहशतीने परिसरातील ग्रामस्थ चांगलेच घाबरले आहे.