नागपूर : एका भरधाव कारने पदपथावर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघाताचा थरार रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिघोरी टोल नाक्याजवळ झाला.
याप्रकरणी कारच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. कांतीबाई गजुड बागडिया (४२, करवली, बुंदी- राजस्थान) आणि सीताराम बाबुलाल बागडिया (३०) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर कविता बागडिया, सुमन बागडिया, सीना बागडिया, सकीना बागडिया, संमद खजूर बागडिया, बुरा हनुमान बागडिया, पानबाई मानसिंग बागडीया अशी जखमींची नावे आहेत.
एक भरधाव कार रविवारी मध्यरात्री साडेबारानंतर उमरेड रोडने नागपुरात येत होती. टोल नाक्यासमोरून जात असताना भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे ती कार रस्त्याच्या लगत असलेल्या पदपथावर चढली. या पदपाथावर मातीची भांडी विकणारे बंजारा कुटुंब झोपलेले होते. या कुटुंबात तीन महिला, चार मुले आणि एक पुरुष असे नऊ जण पदपाथावर झोपले होते. या नऊ जणांच्या अंगावरून कार गेली.
या अपघातात नऊही जण गंभीर जखमी झाले होते. अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींपैकी दोन महिलांचा मृत्यू झाला तर उर्वरित सात जणांवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपी कारचालक भूषण लांजेवार याला वाठोडा पोलिसांनी अटक केली.
सीसीटीव्ही चित्रफीत प्रसारित
उमरेड रोडवरील टोल नाक्याजवळ असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भरधाव कार पदपाथावरून जात असल्याची दिसत आहे. अपघात झाल्यानंतर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पदपाथावर रक्ताचा सडा सांडला होता.
मद्यधुंद कारचालकाचे आणखी दोन बळी
गेल्या दोन महिन्यांपूर्वी नागपुरात रामझुलावर झालेल्या अपघातात मद्यधुंद कारचालक रितिका मालू हिने दोन युवकांचा बळी घेतला होता तर आता मद्यधुंद भूषण लांजेवार यांनीही पदपाथावर झोपलेल्या दोन महिलांना चिरडून ठार केले. नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.