सावधान! सावधान! सावधान! पावसाळ्यात …. विज यंत्रणेपासून … सावधान..!

0
26

गोंदिया महावितरण परिमंडळाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

गोंदिया,16 मे २०२५ : आजकाल संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या पार्श्वभूमीवर, संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर, महावितरण गोंदिया परिमंडळ द्वारे, मान्सूनपूर्वीचे देखभाल व दुरुस्तीचे कामे आता युद्धस्तरावर सुरू करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनीही आप-आपल्या स्तरावर विशेष काळजी घेणे, अत्यावश्यक आहे, असे आवाहन गोंदिया महावितरण परिमंडळातर्फे करण्यात आले आहे.

घराघरात नागरिकांनी घेण्यात येणारी वीज यंत्रणेबद्दल काळजी;

विजेची उपकरणे हाताळतांना आपले हात पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करा. ओल्या हातांनी विद्युत उपकरणांना स्पर्श करणे धोकादायक ठरू शकते. विद्युत उपकरणांचे पाण्याजवळ संपर्क येणार नाही याची दक्षता घ्या. पाणी विद्युत सुवाहक असल्याने अपघात होण्याची शक्यता असते. उपयोग नसतांना विद्युत उपकरणांचे प्लग बोर्डातून काढून ठेवा. यामुळे अनावश्यक वीज वापर टाळता येतो आणि सुरक्षितताही राखली जाते. घरातील अर्थिंगची नियमित तपासणी करा. व्यवस्थित अर्थिंग नसल्यास विजेचा धक्का बसण्याचा धोका वाढतो. वीज पुरवठ्यातील चढ-उतारांमुळे उपकरणे खराब होऊ शकतात. त्यामुळे शक्य असल्यास स्टॅबिलायझरचा वापर करा.

पावसाळ्यात ओलसर भिंतीना स्पर्श करणे टाळा. तसेच, वीजप्रवाह उतरण्याची शक्यता असलेली उपकरणे ओलसर भिंतीजवळ ठेवू नका. ज्यांचे घर पत्र्याचे आहे, त्यांनी पावसाळ्यापूर्वी घरातील वायरिंगची तपासणी करून घ्यावी. इन्व्हर्टर, यूपीएस आणि बॅटरीसारख्या उपकरणांची वेळोवेळी तपासणी करणे महत्त्वाचे आहे. विजा कडकडत असताना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी विद्युत उपकरणे वापरणे टाळा.

घराबाहेरची काळजी
पावसाळ्याच्या दिवसांत विजेचे खांब धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे या खांबापासून सुरक्षित अंतर ठेवा. विज रोहित्र किंवा खांबाजवळ खड्डा असल्यास आणि त्यात पाणी साचले असल्यास त्यापासून दूर राहा. घराजवळ विज तारा लोंबकळत असल्यास त्याची माहिती तात्काळ महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना द्या. स्वत: दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करु नका. जर कुणाला विजेचा धक्का बसला तर त्याला थेट हात लावू नका. लाकडी काठी किंवा इन्सुलेटेड वस्तूने त्याला अलग करा आणि त्वरित उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जा.
यासोबतच, महावितरणाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यापूर्वी आपल्या परिसरातील विज, खांब, तारा, रोहित्र किंवा इतर कोणत्याही विद्युत उपकरणात काही बिघाड आढळल्यास स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी, त्वरित आपल्या भागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. विज खांबांना स्पर्श करणे टाळा आणि पावसाळ्यापूर्वी घरातील वायरिंग व अर्थींग तपासून संभाव्य धोका टाळा.

अनेकदा पावसाळ्यात विजपुरवठा खंडीत झाल्यास काही नागरिक त्वरित विज सुरू करण्याच्या प्रयत्नात अकुशल वायरमनची मदत घेतात. मात्र असे करणे धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अधिकृत तंत्रज्ञांचीच मदत घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कोणतीही अडचण आल्यास, संपर्क साधा…
वीजग्राहकांना विजे संबंधित कोेणत्याही समस्यांसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी १८००२३३३४३५, १८००२१२३४३५ आणि १९१२ या टोल फ्री क्रमांकावर २४ तास संपर्क साधता येईल. या क्रमांकांवर विजपुरवठा खंडीत झाल्याच्या तक्रारीसोबतच वीज अपघात आणि वीज बिलासंबंधी तक्रारी देखील नोंदवण्याची सोय उपलब्ध आहे. असे गोंदिया महावितरण परिमंडळातर्फे कळविण्यात आले आहे.