
मुंबई, दि. ०९ जूनः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, विद्यार्थी विकास विभाग आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रामार्फत रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मुंबई विद्यापीठातर्फे सलग दुसऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणावर गड किल्ले स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शिवस्मारक उत्सव समिती किल्ले रायगड आणि सह्याद्री सेवक प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने या स्वच्छता मोहिमेअंतर्गत किल्ले रायगड आणि परिसरातील प्लास्टीक्स संकलन आणि कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेचे ५८१ स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे ३७ कार्यक्रम अधिकारी, विविध शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आयोजित केलेल्या किल्ले रायगड स्वच्छ मोहिमेत प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा. कविता लघाटे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे समन्वयक सुशील शिंदे, आजीवन व अध्ययन विस्तार विभागाचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी आणि जिल्हा समन्वयक डॉ. तुलसीदास मोकळ यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुंबई विद्यापीठामार्फत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ७ जून २०२५ रोजी विद्यापीठातर्फे किल्ले रायगड स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ३० एप्रिल २०२५ रोजी मुंबई विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठामार्फत शिवकालीन शस्त्रप्रदर्शन, शोभायात्रा, गडकिल्ल्यांचे छायाचित्र व माहिती, छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा ( पोवाडा) आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गड किल्ल्यांची माहिती व्हावी, भव्य आणि ऐतिसहासिक किल्ले आणि वास्तूंपासून प्रेरणा मिळावी, ऐतिहासिक आणि समृध्दशाली वारसाचे जतन व संवर्धन व्हावे, किल्ले व परिसर स्वच्छ व सुंदर राहावे अशा व्यापक दृष्टिकोनातून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाने सलग दुसऱ्या वर्षी राबवलेल्या या मोहिमेला विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विद्यापीठामार्फत गड किल्ले स्वच्छता मोहिमेची व्याप्ती वाढवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शाहीर यशवंत जाधव यांच्या पोवाड्याच्या सादरीकरणानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.