लोकशाहीच्या मूल्यांसाठी लढलेले सेनानी आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरत आहेत-निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे

0
20
आणीबाणी लढ्यातील गौरवमूर्तींचा तालुकास्तरावर सन्मान ; चित्रप्रदर्शनाचेही उद्घाटन
वाशिम,दि.26 जून –आणीबाणी काळात भारतीय संविधान आणि लोकशाहीची मूल्ये कायमस्वरूपी जतन करण्यासाठी लोकशाही लढ्यातील बंदिवास भोगलेल्या सेनानींचे मोलाचे योगदान राहिले असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले.
देशातील १९७५ साली लागु झालेल्या आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत वाशिम जिल्ह्यातील बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा वाशिम , मालेगाव व मंगरूळपीर तहसील कार्यालयात सन्मान करण्यात आला.तसेच आणीबाणी लढ्यातील गौरवमूर्तींच्या सन्मानार्थ चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संबोधित करतांना श्री. घुगे बोलत होते.
यावेळी दि. २५ जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन परिसरात आयोजित आणीबाणी काळातील घडामोडींवर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, जिल्हा माहिती अधिकारी यासिरोद्दिन काझी, जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, सहाय्यक अधीक्षक सुनील घोडे, सविता डांगे यांचीही उपस्थिती होती.
आणीबाणी लढ्यातील व्यक्तींनी भारतीय संविधान आणि लोकशाहीची मूल्ये भविष्यातही कायमस्वरूपी जतन ठेवण्याचा संदेश पुढच्या भावी पिढीपर्यंत निरंतरपणे पोहोचवावा,” अशी अपेक्षा निवासी जिल्हाधिकारी श्री घुगे यांनी यावेळी व्यक्त केली.
देशात दि. २५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान व यथोचित गौरव करण्याच्या व आणीबाणी संदर्भात प्रदर्शन आयोजित करण्याच्या सूचना केंद्र व राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या.
त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी चित्रप्रदर्शनाला भेट देवून पाहणी केली. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.