संविधानाच्या रक्षणासाठी बसप कटिबद्ध-डॉ.हुलगेश चलवादी

0
10
घटना बदलण्याची भाषा करणाऱ्यांना वैचारिक प्रत्युत्तर देण्याची वेळ


पुणे:-
संविधानाच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटवण्यासंदर्भात विचार करावा, असं सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आले होते.परंतु, संघांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले हे वक्तव्य संविधानाच्या आत्म्यावर आघात करणारे आहे. घटनेत कुठल्याही प्रकारचा बदल करून त्याची दिशा आणि तत्व बदलण्याचा प्रयत्न बहुजन समाज सहन करणार नाही, असा इशारा पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी रविवारी (ता.२९) दिला.

घटना बदलण्याची भाषा करणाऱ्यांना वैचारिक, सामाजिक आणि राजकीय लढ्यातून चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. आरक्षण, समानता, सामाजिक न्याय आणि घटनात्मक मूल्यांचा पुरस्कर्ता हा आमचा संघर्ष असून तो अखेरच्या श्वासापर्यंत चालू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसप संविधान व बहुजन हितार्थ ठोस कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जाईल, असे डॉ.चलवादी म्हणाले.बहुजन समाजाने देखील भारतरत्न, संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने चालवणाऱ्या बसप च्या मागे उभे राहावे,असे आवाहन देखील त्यांनी केले.
संविधानामुळेच देशातील कोट्यवधी शोषित, पीडित, उपेक्षित, वंचितांना आत्मसन्मानाने जगण्याचा आणि जीवनात अग्रेसर होत स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा अधिकार मिळाला आहे.परंतु,आरक्षणासह त्यांच्या घटनादत्त अधिकार हिरावून घेतले जात असतील तर सर्वसामान्य गप्प बसणार नाही, शिवाय त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी बसप देखील रस्त्यावर उतरेल, असे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेश च्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहन मायावती जी यांनी स्पष्ट केल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.भारतीय संविधानाचे रक्षण व त्याच्या मूळ तत्त्वांची अंमलबजावणी हे पक्षाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सुश्री बहन जी यांनी स्पष्ट केले.
देशातील बहुजन समाज – विशेषतः गरीब, मजूर, शेतकरी, महिला, छोटे व्यापारी, अनुसूचित जाती-जमाती आणि अन्य मागासवर्ग यांच्यावर सत्ताधारी पक्षांनी चालवलेली चुकीची धोरणे, भेदभावपूर्वक वर्तन ही गंभीर बाब आहे. या वर्गांच्या अधिकारांचे आणि संविधान रक्षणासाठी बसपा कटिबद्ध आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.
केंद्र सरकार ने घटनात्मक संस्थांचा गैरवापर करत अल्पसंख्याक आणि दलित समाजांवर अन्याय केला आहे. देशात धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली जातीय तेढ आणि हिंसाचाराला खतपाणी घालण्याचे प्रकार वाढले आहेत.महिलांवरील अत्याचार, अल्पसंख्याकांवरील हल्ले, आणि बेरोजगारी-महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे, अशा शब्दात सुश्री मायावती जी यांनी सत्ताधाऱ्यांवर टिका केल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
देशात सर्व भाषांना सन्मान द्या
देशात एक भाषा लादण्याच्या प्रयत्नांवरही सुश्री बहन मायावती जी यांनी नाराजी व्यक्त केली.भारत हा विविधतेने नटलेला देश असून सर्व भाषांना समान मान्यता मिळायला हवी, असे त्या म्हणाल्या.तसेच, संविधानाची अंमलबजावणी आणि सर्व घटकांना समान न्याय मिळणे यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे,असे मतही त्यांनी व्यक्त केले.