गीता ताई निर्विकार या दररोज तहसील कार्यालयात इडली, ढोकळा आणि अप्पे विकण्यासाठी येतात. त्या आमच्या कक्षातही येतात. सहज संवाद साधताना त्यांनी सांगितले की, त्या “दिव्य ज्योती” नावाच्या बचतगटाच्या सचिव आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी वैयक्तिक कर्ज घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार उभा केला आहे. ज्या दिवशी जे शक्य असेल, त्या दिवशी त्या इडली, ढोकळा, अप्पे असे नाश्त्याचे पदार्थ बनवून आणतात.
तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये कॅन्टीन असले तरी सर्व अधिकारी व कर्मचारी तिथे जातीलच असे नाही. ज्यांना कॅन्टीनमध्ये जाणे शक्य नसते, त्यांच्यासाठी गीता ताईंचा नाश्ता हा भुकेची वेळ भागवणारा ठरतो.गीता ताईंना एक मुलगी आणि दोन मुलगे आहेत. त्यांचे पती खाजगी ठिकाणी नोकरी करतात. शासनाकडून मिळालेल्या वैयक्तिक कर्जामुळे त्या छोट्या उद्योजिका बनल्या असून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत आहेत.
गीता ताईंच्या हाताला चव असल्यामुळे त्या त्यांच्या काही मैत्रिणींसोबत छोट्या-मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जेवण तयार करून देतात. आता त्यांचा स्वतःचा स्थिर रोजगार निर्माण झाला आहे. घेतलेल्या कर्जाची त्या नियमितपणे, ठरलेल्या तारखेला परतफेड करतात. याशिवाय त्यांच्या हातात थोडी बचतही होते, ज्यातून त्या मुलांच्या शिक्षणाचा आणि घरखर्चाचा भार सांभाळतात.
राज्य शासनाने जीवनोन्नती कार्यक्रमांतर्गत बचत गटांना सामूहिक तसेच वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत लाखो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. त्यापैकी गीता ताईंचा एक यशस्वी उदाहरण आहे.गीता ताई शासनाचे मनापासून आभार मानतात. त्या सांगतात, “शासनामुळे मला ही संधी मिळाली. आज मी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहात माझेही योगदान आहे, याचा मला अभिमान वाटतो.”
– जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया





