गोंदिया, दि.27 : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली काढण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली दि.21, 22 व 23 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे सामंज्यस्याने निकाली काढण्यासाठी ‘समाधान समारोह-2026’ या विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये 23 प्रकरणे गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झाले, त्यापैकी 3 प्रकरणे इतर जिल्ह्यात स्थांनातरीत करण्यात आले. 20 प्रकरणांपैकी 1 प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढले. उर्वरीत 19 प्रकरणात मध्यस्थी करीता त्यातील सर्व पक्षकारांच्या पुर्वबैठका जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के. वाळके यांनी प्रत्यक्ष व आभासी पध्दतीने घेवुन मध्यस्थी केली. त्यामुळे 19 प्रकरणांपैकी 4 प्रकरणे सामोपचाराने व सामंजस्याने निकाली काढण्यात यश आले.
सदर प्रकरणे निकाली काढण्याकरीता व ‘समाधान समारोह-2026’ ही विशेष लोक अदालत यशस्वी करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया येथील न्यायालयीन कर्मचारी व पी.एल.व्ही यांनी अथक परिश्रम घेवुन सहकार्य केले. अशाप्रकारे सदर लोकअदालतीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणातील पक्षकारांना दिल्लीला जाण्याची गरज भासली नाही. तसेच पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिळाल्यामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले.
अशाच लोकअदालतीचा लाभ सामान्य लोकांना मिळण्याकरीता दि.12 सप्टेंबर 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यात नियमित लोकअदालतीचे आयोजन केले आहे. त्याचा संबंधीत पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.





