तरुणांनो जॉब क्रियेटर व्हावे
भंडारा, दि. ३ : तरुणांनी केवळ नोकरीच्या संधींच्या मागे न लागता स्वतः रोजगार निर्माण करणारे ‘जॉब क्रिएटर’ बनण्याचा दृष्टिकोन स्वीकारावा. शासनाच्या विविध रोजगारनिर्मिती योजनांचा लाभ घेऊन स्टार्टअप, उद्योग व नाविन्यपूर्ण व्यवसाय उभारावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले.
साकोली येथील एम. बी. पटेल महाविद्यालयात ‘कनेक्ट विथ कलेक्टर’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना ते बोलत होते. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई, तहसीलदार निलेश कदम, प्राचार्य डॉ.डी.एस चौधरी यांची उपस्थिती होती.या संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न, स्थानिक समस्या आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीची गरज असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. भंडारा जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबत विद्यार्थ्यांनीही प्रश्न उपस्थित केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगारासाठी पुणे, मुंबई, दिल्ली यांसारख्या शहरांकडे जावे लागते. त्यामुळे जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तरुणांनी नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनण्याचा दृष्टिकोन ठेवण्याची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासह विविध शासकीय योजनांमधून उपलब्ध होणारे कर्ज व अनुदान यांचा लाभ घेऊन उद्योग-व्यवसाय सुरू करता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.भंडारा जिल्ह्यात शेती आणि मत्स्यव्यवसाय ही महत्त्वाची क्षेत्रे असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी त्यामध्ये मोठी संधी आहे. यासोबतच रिन्यूएबल एनर्जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि तंत्रज्ञानाधारित व्यवसाय या उदयोन्मुख क्षेत्रांकडेही तरुणांनी गांभीर्याने पाहावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
जिल्ह्यात ऑर्डनन्स फॅक्टरी आणि सनफ्लॅग यांसारखे उद्योग आहेत. त्यासोबतच नवीन मोठे उद्योग व गुंतवणूक जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तरुणांनी केवळ सुरक्षित पर्यायांपुरते मर्यादित न राहता जोखीम स्वीकारण्याची तयारी ठेवावी आणि स्थानिक समस्यांवर सोपे, व्यावहारिक व नाविन्यपूर्ण उपाय शोधावेत, असा संदेशही त्यांनी दिला.
प्रत्येक गावात वाचनालयासाठी प्रयत्न
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बहुतांश अभ्यास साहित्य व पुस्तके ऑनलाइन उपलब्ध असली, तरी शांत व पोषक अभ्यासाचे वातावरण मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक गावात वाचनालय उभारण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.‘कनेक्ट विथ कलेक्टर’ उपक्रमामुळे विद्यार्थी, नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक थेट व सुसंवादी होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या स्थानिक प्रश्नांची दखल घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





