वृत्तसंस्था विजयवाडा दि. 28 – आंध्रप्रदेशमधील विजयवाडाजवळ आज (मंगळवार) सकाळी पुलावरून जाणारी एक खाजगी बस नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार तर 30 जण जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त बस ही भुवनेश्वरहून हैदराबादच्या दिशेने जात होती. तब्बल एक हजारपेक्षा अधिक प्रवास झाल्यानंतर विजयवाडा येथे बसचा चालक बदलण्यात आला. आज सकाळी साडे पाच वाजता ही बस मुल्लापदू नदीवरून जाणाऱ्या दोन पुलांमधील फटीमध्ये शिरली आणि नदीत कोसळली. या भीषण अपघातात आठ जण ठार तर 30 जण जखमी झाले. जखमींना नादीगामा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्त बसमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. चालकाला झोप येत असावी आणि त्याच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.




