23.9 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home विदर्भ ‘मैत्रेय’चे गुंतवणूकदार रस्त्यावर

‘मैत्रेय’चे गुंतवणूकदार रस्त्यावर

0
31

चंद्रपूर दि.०५-: चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदार, प्रतिनिधींनी मैत्रय सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीत कोट्यवधींची गुंतवणूक केली. मात्र गेल्या दीड वर्षांपासून दोन्ही जिल्ह्यातील कंपनीचे कार्यालय बंद पडले. त्यामुळे गुंतवणूक केलेली रक्कम मिळनेही आता दुरापास्त झाले आहे. ग्राहकांच्या तक्रारीवरून कंपनीची मालमत्ता जप्त करण्यात आली असून या रकमेतून पैशाची परतफेड केली जात आहे. मात्र जिल्ह्यातील खातेदार, प्रतिनिधींना अजूनही त्यांच्या हक्काची रक्कम मिळालेली नाही. आपले पैसे परत मिळावे, यासाठी शनिवारी शेकडो खातेदार, प्रतिनिधी रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले.कंपनीकडे ग्राहकांची कोट्यवधींची रक्कम आहे. मात्र, ते देण्यास टाळाटाळ सुरू आहे. या विरोधात नाशिक येथील ग्राहकांनी पोलिसात तक्रार केली. तक्रारीनुसार संचालिका वर्षा सत्पाळकर यांना अटक करण्यात आली. कंपनीचे बँक खाते सील केले. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात याची केस सुरू होती. कंपनीच्या मालमत्तेची विक्री करून त्यातून मिळणारा पैसा ग्राहकांना परत करावा, असा आदेश दिला. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात व्हावी, या मागणीला घेऊन चंद्रपुरातील गांधी चौकातून मोर्चा निघाला. यात चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिनिधी, गुंतवणूकदार सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व बीआरएपीचे राजू झोडे यांनी केले.

मधुसूदन सत्पाळकर नामक व्यक्तीने १९९८ मध्ये मैत्रेय कंपनीची स्थापना केली. यात बचत ठेव करण्याची सुविधा होती. चंद्रपूर व लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातही या कंपनीची सुरुवात झाली. कंपनीने दोन्ही जिल्ह्यात कार्यालय सुरू केले. हळूहळू कंपनीचा व्याप वाढला. बल्लारपूर आणि सिंदेवाही येथेही कंपनीने कार्यालय सुरू केले. सुशिक्षित बेरोजगारही या कंपनीचे एजंट बनले. त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या हितचिंतकांनी शेकडो रुपयांची मैत्रेय कंपनीत गुंतवणूक केली. प्रारंभीचे काही वर्षे कंपनीचा कारभार सुरळीत सुरू होता. मात्र, २००९ मध्ये मैत्रेय सर्व्हिसेस प्रा.लि. बंद करण्यात आली.