33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Featured News हे होते शरद पवाराचे राजकीय गुरु

हे होते शरद पवाराचे राजकीय गुरु

0
49

blank

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे पाचवे उप पंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे. महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर ज्यांचा प्रभाव होता असे ते राजकारणी होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यासोबतच सामाजिक कार्य आणि साधी राहाणी हे त्यांचे वैशिष्टय होते. भारताच्या उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले असले तरी सामान्य माणसाशी त्यांची नाळ जोडलेली होती. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक तरुणांमधील नेतृत्वगुण व धडाडी ओळखून त्यांना पुढे आणले. यातील एक नाव म्हणजे शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे यशवंतरावांना राजकीय गुरु मानतात.यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी कराड येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. बालपणीच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांची आई आणि काका यांनी त्यांचा सांभाळ केला. यशवंतरावांना आईकडूनच आत्मनिर्भरता आणि देशभक्तीची शिकवण मिळाली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले. त्यांनी उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे घेतले आणि बी.ए., एलएल. बी. झाले. 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली, तेव्हा त्यामध्ये त्यांनी भाग घेतला. 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांशी त्यांचा परिचय झाला आणि त्यामुळे काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.

दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली व ते काँग्रेसमध्येच राहिले व 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सामील झाले. सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यातून पुढे प्रतिसरकार स्थापन झाले, पण त्यावेळी ते तुरुंगात होते; त्यामुळे प्रतिसरकारशी त्यांचा तसा फारसा संबंध राहिला नव्हता. 1946 साली तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन यशवंतराव दक्षिण सातारा मतदार संघातून निवडले गेले आणि संसदीय चिटणीस झाले.
1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली व 1952 च्या निवडणुकीनंतर ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले. द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 1 नोव्हेंबर 1956 रोजी सूत्रे हाती घेतली. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले व त्याचे ते पहिले मुख्यमंत्री निवडले गेले. पुढे 1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, 1966-70 गृहमंत्री, 1970-74 पर्यंत अर्थमंत्री आणि 1974 पासून परराष्ट्रमंत्री बनले.रॉय यांची विचारसरणी व महात्मा गांधींची आंदोलने यांकडे यशवंतराव आकर्षित झाले, तरी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आचारविचारांचा त्यांच्यावर खोल ठसा उमटला आहे. नेहरूप्रमाणे डावीकडे झुकलेला मध्यममार्गी नेता, असे त्यांचे वर्णन करता येईल. त्यांच्या शासकीय तसेच प्रशासकीय कौशल्याचा व लोकनेतृत्वाचा प्रत्यय द्वैभाशिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे आले, तेव्हा आला. त्यांनी अल्पसंख्य बिगरमराठी समाजाचा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास आपल्या कर्तबगारीने, कार्यक्षम कारभाराने संपादन केला व मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याने काहीही उलथापालथ होणार नाही, याची वरिष्ठ नेत्यांस खात्री पटविली.चिनी आक्रमणानंतर संरक्षणखात्यात चैतन्य आणण्याची जबाबदारी यशवंतरावांनी पार पाडली. 1967 च्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा अनेक राज्यांत पराभव झाला. त्यामुळे देशात जी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती, त्या परिस्थितीत त्यांनी गृहखाते खंबीरपणे पण कौशल्याने सांभाळले. अर्थखाते त्यांच्याकडे आले, तेही बांगलादेशाचे युद्ध, दुष्काळ वगैरेंमुळे खालावलेल्या आर्थिक परिस्थितीत. माजी संस्थानिकांचे तनखे रद्द करणे इत्यादी उपाययोजना त्यांच्या कारकीर्दीत झाल्या. चलनवाढीला आळा घालण्याचे कडक उपाय योजण्याच्या धोरणाचा प्रारंभही यशवंतरावांच्या कारकीर्दीत झाला.

blank