
कोल्हापूर- गोंदिया जिल्हाधिकारी राहिलेले डाॅ.अमित सैनी यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली.त्यानुसार त्यांनी आपला गोंदियाचा प्रभार बुधवारी सोपवित गुरुवारला कोल्हापुरचा पदभार स्विकारण्यासाठी रवाना झाले.तिथे पोचल्यावर पदभार स्विकारण्यासाठी करावा लागणारा सर्व सोपस्कार त्यांनी पार पाडला.परंतु अवघ्या तासाभरातच मंत्रालयातून कोल्हापूर जिल्हाधिकारी पदाचा प्रभार हा राजाराम माने यांच्याकडेच राहिल असे कळवून डाॅ.सैनी यांना बिनजिल्ह्याचे जिल्हाधिकारी विद्यमान भाजप सेना सरकारने बनविले आहे.सध्या 24 एप्रिलपर्यंत सैनी यांना कोल्हापुर जिल्हाधिकारी पदावर बसण्यासाठी वाट बघावी लागणार आहे.
जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारलेल्या डॉ. अमित सैनी यांना गुरुवारी अवघ्या तासाभरातच कार्यभार सोडावा लागला. नूतन जिल्हाधिकाऱ्यांचा स्वागत समारंभ सुरू असतानाच जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार २३ एप्रिलपर्यंत राजाराम माने यांच्याकडे ठेवण्याचा मंत्रालयातून फोन आला. ग्रामपंचायत निवडणुकांच्या कारणास्तव हा कार्यभार ठेवला असल्याचे सांगण्यात आले.
२६ मार्च रोजी माने यांची पुणे येथील क्रीडा व युवा संचालनालयाच्या आयुक्तपदी तर गोंदिया येथील जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली होती. सैनी यांच्या जागी येणारे नवीन जिल्हाधिकारी आले नसल्याने त्यांच्याकडे कार्यभार होता. त्यानंतर गुरुवारी (९ एप्रिल) कोल्हापूरचा कार्यभार स्वीकारण्यासाठी सैनी दुपारी आले. सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी राजाराम माने यांच्याकडून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी चर्चा करून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेला सैनी यांचे स्वागत तर माने यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाकडे सर्किट हाऊसकडे गेले. तिथे प्रथम दोघांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांची भाषणे सुरू असतानाच मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातून फोन आला. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणूक आहेत. २२ एप्रिलला मतदान असून, २३ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत कार्यभार माने यांच्याकडेच राहील, असे सांगण्यात आले. त्यानुसार २३ एप्रिलपर्यंत माने हेच जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
बदलीचे आदेश निघाल्यानंतर पाचव्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. यादरम्यान आदेश निघाला नव्हता. पण कार्यभार स्वीकारल्यानंतर तासाभरात सामान्य प्रशासनाला निवडणुकीची माहिती व्हावी, हे कोडे पडले आहे. अशा पद्धतीच्या आदेशाने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.




