
सावली(तुलसीदास भुरसे)दि.14ः– राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने चंद्रपूर येथून 2 मार्च रोजी सुरु झालेली
ओबीसी अस्मिता रथयात्रेचे सावली तालुक्यात पोचताच भव्य स्वागत करण्यात आले. शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला रथयात्रेतील सहभागी सर्व मान्यवरांनी माल्यार्पण केले.ही रथयात्रा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात निघालेली आहे. बाजार चौक पाथरी येथे सचिन राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला श्याम लेंडे,अविनाश पाल,दिनेश चिटनुरवार,डॉ. तुषार मर्लावार,सभापती विजय कोरेवार, सावली तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष कविंद्र रोहणकर,सचिव भाऊराव कोठारे,अनिल गुरनुले,अर्जुन भोयर,किशोर घोटेकर,दिवाकर गेडाम,शोभाताई बाबनवाडे,उषाताई भोयर,पवन कवठे,प्रसिध्दी प्रमुख विनोद धोटे आदी उपस्थित होते.
मंडल आयोगानुसार देशात 3743 जाती समुह असून 1931 मध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना इंग्रजांच्या काळात होऊन 52% इतका जनसमूह ओबीसींचा असल्याचे स्पष्ट झाले.परंतु त्यानंतर आजपर्यंत ओबीसींची जनगणना कुठल्याच सरकारने केलेली नाही.येत्या होऊ घातलेल्या 2021 च्या जनगणनेत ओबीसीची स्वतंत्र जनगणना झाल्यास नक्कीच 70% जनसमूह असल्याची आकडेवारी समोर येऊ शकते.त्याकरीता संपूर्ण ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे.जनगणना झाली तरच ओबीसी प्रवर्गातील जातीचा विकास होईल, अन्यथा ओबीसी प्रवर्गातील जातीवर फार मोठा अन्याय होईल,जो भारत स्वतंत्र झाल्यापासून होत आहे.त्यामुळे 1 मे पासून सुरु होणाऱ्या जनगणना फार्मेट मध्ये ओबीसीचा स्वतंत्र रकाना नसल्याने संपूर्ण ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या जनतेनी जनगणना करण्यास स्पष्टपणे नकार देऊन कोणतीही माहिती देऊ नये,एकसंघ होऊन बहिष्कार टाकावा असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी पाथरी येथील सभेत आवाहन केले.ही अस्मिता यात्रा तालुक्यातील कवठी , उसेगाव, हरांबा, कापसी, व्याहाड बुज, व्याहाड खुर्द, निमगाव, अंतरगाव, निफंद्रा, गेवरा बुज, पालेबारसा व पाथरी आदी गावामध्येये पोचून नागरिकांना पत्रकाच्या माध्यमातून माहिती देऊन जनगणनेचे महत्व पटवून दिले.अस्मिता यात्रेला जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.