
मुंबई,दि.31: करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला ‘अनलॉक ३’ चा टप्पा ३० ऑगस्ट रोजी संपत असून केंद्र सरकारकडून ३० सप्टेंबपासून अनलॉक ४ टप्पा सुरु होईल अशी घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून घोषणा झाल्यानतंर राज्य सरकारच्या नियमावलीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार राज्य सरकारने निमयावली जाहीर केली असून ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनलॉक-4 च्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार, मार्च महिन्यापासून सुरू असलेली जिल्हा बंदी अखेर उठवली आहे. आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज नसेल.
राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू करण्यास परवानगी असेल. परंतू, अद्याप मेट्रो आणि सिनेमा गृहांना परवानगी देण्यात आलेली नाही. राज्याने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबईतील विमानसेवेतील उड्डाणांची संख्या दुप्पट केली जाणार आहे.
जाणून घ्या अनलॉक-4 मध्ये काय सुरू आणि काय बंद?
- शाळा-कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच
- 30 सप्टेंबरपर्यंत मेट्रोलाही रेड सिग्नल
- खासगी बस आणि मिनी बसला परवानगी
- चित्रपटगृह 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
- मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही
- राज्यातील हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार
- संस्कृतिक, सामाजिक, क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातले कार्यक्रम तसेच मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र येता येणार नाही
- अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आधीच्या नियमावलीचे पालन करतील
- मुंबई आणि एमएमआर एरिया तसेच पुणे पिंपरी या क्षेत्रांमध्ये ऑफिसमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थिती राहता येईल
- सर्व कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य
- प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार तर रिक्षामध्ये तीन प्रवाशांना मुभा
- खासगी चारचाकी वाहनात चार लोकांना प्रवास करण्याची मुभा
- 50 पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येता येणार नाही
- अंत्यविधीसाठीही 20 पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाही





