
अर्जुनी/मोर,दि.31:-धान आणि मका उत्पादक शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे थकीत चुकाऱ्यांच्या मागणीसाठी आज(दि.31) तालुका शिवसेना शाखा केशोरीच्या वतीने केशोरी गव्हर्रा टी पॉईंटवर तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला. आदिवासी विकास महामंडळ नवेगाव बांधचे व्यवस्थापक पाटील यांच्या लेखी आश्वासनंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
सविस्तर असे की याआधी 18 ऑगस्टला आदिवासी विकास महामंडळचे व्यवस्थापकांना निवेदनातून शेतकऱ्यांचे चुकारे देण्याबाबत मागणी केली होती.अन्यथा 31 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला होता.यानुसार आदिवासी विकास महामंडळातर्फे केशोरी व गोठणगाव येथील शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे जमा झाले.मात्र
ईळदा, पांढरवानी च्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही रब्बी धान/मका पिकाचे चुकारे जमा झाले नाही.
आज इशाऱ्याची मुदत समपूनही मागणी मान्य न झाल्याने गवरा टी पॉइंटवर शेतकरी व शिवसेना पदाधिकारी यांनी रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल दोन तास केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक पाटील यांनी लिखित आश्वासन देऊन बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दहा दिवसात रक्कम जमा होण्याची लिखित आश्वासन दिले.आश्वासना नंतर शिवसेनेने तात्पुरते आंदोलन मागे घेतले.यावेळी नायब तहसीलदार वाढई उपस्थित होते.शिवसेना उपजिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात तालुका संघटक चेतन दहिकर ,युवा सेना तालुका प्रमुख अभिजीत मशीद, शिवसेना उपतालुका प्रमुख ज्ञानदेव कापगते, शिवसेना विभाग प्रमुख सुशील गहाणे ,शाखाप्रमुख नरेश बोरकर, लीलाधर ठाकरे ,विनोद भजने ,शेखर राय ,राजु कोलाम, पंकज नरोटे ,देवा ठलाल, शेतकरी देवा डोंगरवार ,धनपाल चौरवाडी ,मार्कंड चौरवाडे, रूपचंद मानकर उपस्थित होते.





