
वडसा,दि.03 : मागील आठवड्यात वैनगंगा नदीमध्ये जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नदी लगतची गावे व शेती पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी म्हणून विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील (वडसा) सावंगी, आमगांव व देसाईगंज येथील नुकसानीची पाहणी केली.
तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून शासनाकडे पाठपुरावा करून लवकरच नुकसान भरपाई मिळवून देणार असे आश्वासन दिले. पूर्व विदर्भातील परिस्थिती खूपच गंभीर आहे.केवळ आजपुरते नाही, तर अनेकांचे भविष्याचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकर्यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली, तरच त्यांना पुढच्या काळासाठी उभे करता येईल. पण, त्यासाठी आज तातडीने पंचनामे करून मदत देण्याची गरज आहे. या सार्याच शेतकर्यांचे वेदना-दु:ख मोठे आहे.
राहायला घरं नाहीत आणि शेती पूर्णत: उद्धवस्त झालेली. संकट मोठे असले तरी तातडीने आणि रोखीने मदत दिली, तर अनेक कुटुंब सावरता येतील. राज्य सरकारने निर्णयशून्यता बाजुला सारत तातडीने मदत करावी.
यावेळी संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ परिणय फुके, खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजभे, आमदार डॉ देवराव होळी, जिल्हाध्यक्ष किसन नागदिवे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,रमेश बारसागडे,नाना नाकाडे, राजू जेठानी, मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.





