
अमरावती,दि.०१ : नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ मे रोजी घडलेल्या सूरज उर्फ सावत्या दिवाकर सावते याच्या हत्याकांड प्रकरणाचा अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट-२ ने अवघ्या चार तासांत छडा लावत पाच आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या या तत्परता दाखवणाऱ्या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या मनात पोलिसांची धास्ती निर्माण झाली आहे.
शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास सुरज उर्फ सावत्या हा शेगाव रहाटगाव रोडवरील सिद्धांत बार मध्ये मित्रासोबत मद्यप्राशन करत असतांना अचानक दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. सावत्या जीव वाचविण्यासाठी बारच्या मागील दाराने धावत गेला मात्र त्याठिकाणी सुद्धा काही (The Murder Case) हल्लेखोर दबा धरून बसले होते आणि सावत्याला पकडून त्याच्या मानेवर, पोटावर चाकूने वार केले. सावत्या रक्ताच्या थारोळ्यात पडला असतांना एकाने मोठा दगड त्याच्या चेहऱ्यावर टाकून पाचही हल्लेखोर तेथून पसार झाले.
गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाच आरोपींनी खून केल्याचे स्पष्ट झाले. गुप्त माहितीनुसार आरोपी मालखेड येथील जंगलात लपल्याचे समजताच पथकाने तत्काळ कारवाई करत मोठ्या शिताफीने आरोपींचा पाठलाग करत त्यांना रात्रीच्या वेळी ताब्यात घेतले.यामध्ये सुनिल सुरेश वानखडे (३५, रा. जिल्हा परिषद शाळेजवळ शेगाव, अमरावती), दिपक सुधीर निस्ताने (२५), रोहीत अशोक खंडारे (२४), विक्की उमेश शेंडे (२३) तिघेही रा. मालखेड, अक्षय वसंत चव्हाण (१९, रा. लालखेड) या आरोपींचा समावेश आहे.चौकशीत सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी नांदगावपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.