
गडचिरोली : एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाला. सदर अपघाताची घटना ९ जुन रोजी सायंकाळच्या सुमारास गडचिरोली शहरापासून जवळ असलेल्या सावेला- मारोडा मार्गावर घडली. दिवाकर विठ्ठल उसेंडी (३२) रा. फुलबोडी (ता. धानोरा) व अनुराग इरईजी मडावी (२८) रा.कसनसूर (ता. एटापल्ली) असे अपघातात ठार झालेल्या युवकाची नावे आहेत.
सोमवारी सदर दोन्ही युवक एम.एच.३३/ एएच/ ३०५० क्रमांकाच्या दुचाकीने गडचिरोली येथून पोटेगाव येथे जात होते. विरूध्द दिशेने येणार्या एम.एच/३३/टी/ ३६९३ क्रमांकाच्या चारचाकी मालू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोटेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पाटिल सिमा मेश्राम सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश्वर मुजुमकर व सुरेश उसेंडी यांनी सहकार्य केले. मृत्युदेह शवच्छेदेनासाठी गडचिरोली येथील रूग्णालयात नेण्यात आले. अधिक तपास पोटेगाव पोलीस करीत आहेत.