
रामटेक,दि.10ःःतालुक्यातील काचूरवाही येथील पोस्ट मास्टर अशोक धनीराम वाडीभस्मे (५४) हे सोमवार, ६ जानेवारीला काचूरवाही येथून अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्यांचा कोणताही थांगपता लागला नाही. शेवटी कुटुंबीयांनी रामटेक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चार दिवसांनी म्हणजे गुरुवारी त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात पुरलेला आढळला. पैशाच्या वादातून त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली.
मृतक अशोक वाडीभस्मे हे काचूरवाही येथील डाक कार्यालयात कार्यरत होते. ते काचूरवाही येथील रहिवासी असून, सहा वर्षांपासून मुलांच्या उच्च शिक्षणासाठी नागपूर येथे राहत होते. नोकरी, घर व शेती काचुरवाहीला असल्याने ते रोज सकाळी रेल्वेने रामटेक आणि रामटेकवरून काचूरवाहीला येत होते. कार्यालयीन कामकाज आटोपून ते नागपूरला परत जात होते. नेहमीप्रमाणे ते सोमवारी सकाळी काचुरवाहीला आले आणि पोस्टाचे कामकाज आटोपून घरी जाण्यासाठी निघाले. नागपूरला जाण्यापूर्वी त्यांनी काचूरवाहीचा सोमवारचा आठवडी बाजार केला. मात्र, यानंतर ते अचानक बेपत्ता झाले. ते अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबासह गावात खळबळ उडाली. तसेच त्यांचा फोनही बंद होता. यानंतर अशोक वाडीभस्मे यांच्या मुलगा सुभाष वाडीभस्मे व पुतन्या रोशन क्रिष्णा वाडीभस्मे यांनी रामटेक पोलिस ठाण्यात अशोक यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. रामटेक आणि अरोली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवित त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलिस अशोक यांचा शोध घेत असताना पुतन्या रोशन वाडीभस्मे याने भगवान डोकरीमारे (रा. काचूरवाही) याच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला.
यावेळी अशोक यांचा खून केल्याचे भगवान याने कबुल केले. यात दोन आरोपींनी त्याला मदत केली असून, हेमराज भलमे (रा. रामटेक) व गोपीचंद तारतर्पे (रा. खोळगाव) अशी आरोपींची नावे आहेत.उपविभागीय पोलिस अधिकारी नयन आलुरकर यांच्या मार्गदर्सनात पोलिस निरिक्षक दिलीप ठाकुर,उप निरिक्षक विवेक सोनवाने यांच्यासह इतर सहकारी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून, आणखी काही आरोपींचा समावेश आहे का? या दिशेने तपास करीत आहेत. खड्डय़ातून मृतदेह काढल्यानंतर रामटेक येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.