राज्य लोकसेवा आयोगाच्या रखडलेल्या परीक्षा व नियुक्त्या त्वरित घ्या

0
20

स्टूडेंट्स राईट्स असोसिएशनचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

  • येत्या 10 दिवसांत मागण्या पूर्ण करा

  • अन्यथा राज्यभर हजारो विद्यार्थ्यांचा मोठा आक्रोश मोर्चा

तिरोडा, दि.30 : कोरोनाचा (कोविड-19) प्रादुर्भाव, मराठा आरक्षण व इतर तांत्रिक कारणांमुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, राज्यातील पदभरती, नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील 15 लाख विद्यार्थी अस्वस्थ आहेत. कोरोनामुळे गरीब सामान्य वर्गातील कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. त्यातच मागील दोन-तीन वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यांसाठी भयावह झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक व मानसिक खच्चीकरण होत असून या सर्व बाबी राज्याच्या दृष्टीकोणातून घातक आहेत. युवक, विद्यार्थी बेजार होत असेल तर राज्याची प्रगती खुंटेल. त्यामुळे रखडलेल्या सर्व परीक्षा, नियुक्त्या, मेगाभरती, पोलीस भरती व सरळसेवा भरती त्वरित घ्यावे, अशा आशयाचे निवेदन स्टूडेंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाने आज मंगळवार, 29 जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना सोपविले.

निवेदनानुसार, मागील तीन वर्षापासून जून 2018 ते जून 2021 या कलावधीत राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या 6 ऐवजी 2 अशी आहे. मागील सरकारने आणि आपल्या सरकारने सुद्धा याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे निर्णय प्रक्रिया संथ झाली व आयोगाच्या अधिकारांवर गदा आली. एमपीएससी ही संविधानिक संस्था असून सुद्धा सरकारची बाहुली बनून काम करत आहे, हे लोकशाहीच्या आरोग्यासाठी घातक आहे.

तीन वर्षांपासून पोलीस भरती झाली नाही, विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे. मागच्या सरकारने महापरीक्षा पोर्टलमार्फत मेगाभरती घेतली. त्यात अनेक घोळ झाले. त्यामुळे आपल्या सरकारने पोर्टल बंद केले. त्याचप्रमाणे आपल्या सरकरमधील आरोग्य विभागाच्या भरतीत सुद्धा अनेक घोळ उघड झाले. गरीब विद्यार्थी मेहनत करून सरकारी नोकरीचे स्वप्न बघत आहे. परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे हे विद्यार्थी मागे पडतात. ज्यांच्याकडे पैसा आहे असे विद्यार्थी 10 ते 20 लाख रुपये देवून नोकर्‍या मिळवून घेत आहेत. ही परिस्थिती भयावह असून विद्यार्थी युवक हवालदिल होत आहे.

महाराष्ट्र राज्यात सर्व प्रकारचे कामे सुरू आहेत, राज्यकर्त्यांना कुठलीही अट नाही. राजकीय पक्षांना बंधने नाहीत. परंतु, विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे सरकार उदासीन का, असा सवालही या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.सदर मागण्या मान्य न झाल्यास येत्या 10 महाराष्ट्रभर हजारो विद्यार्थ्यांचा मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देतेवेळी चेतनकुमार मरस्कोल्हे, रोहितकुमार तिरपुडे, कुणाल डोंगरे, विशाल मुरे, संजय कनोजे, मंगेश गेडाम,  उत्तम बिसेन, चेतन पटले, शुभम कुंभारे, प्रतिण डोंगरे, संजय कनोजे व रवी राऊत उपस्थित होते.