देवरीचा अक्षद आचले एस.टी. गटातून राज्यात पहिला; ‘नीट’ परीक्षेत रोवला यशाचा झेंडा

0
87

देवरी,दि.२२ : निचित केलेले ध्येय गाठायचे असेल तर त्यागाशिवाय पर्याय नाही,हे अक्षद आचले या विद्यार्थ्याने स्वतःच्या कृतीतून सिद्ध केले आहे. मूळचा गोंदिया जिल्ह्यातील देवरीचे येथील रहिवासी असलेला अक्षद किशोरी आचले अकोल्यात राहून ‘नीट’ची शिकवणी करीत होता. मागील दोन वर्षांत तो गावाला गेला नाही आणि सोशल मीडियावरही त्याने वेळ गमावला नाही. केवळ अभ्यास अन् अभ्यास तोही सातत्यपूर्ण आणि जिद्दीने करीत अखेर त्याने आपले ध्येय गाठले. नुकत्याच लागलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या निकालात त्याने अनुसूचित जमाती गटातून राज्यात पहिला येण्याचा बहुमान पटकावला तर देशात त्याची 10 वी रैंक आहे.
या यशस्वी वाटचाली बाबद अक्षद आचले म्हणतो की, मी मूळचा गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील रहवासी असून दहावी पास झाल्यानंतर नीटच्या तयारीसाठी माझ्या वडिलांनी अकोल्याला पाठविले. या दरम्यान मी दिवाळी वगळता गावीही गेलो नाही. तसेच सोशल मीडियाच्या मोहजालापासून दूर राहिलो. माझे वडील गोंदिया जिल्ह्यातील देवरी पंचायत समिती मध्यवर्ती कृषी विस्तार अधिकारी आहेत. दोन वर्षांपूर्वी मोठ्या भावालाही वडिलांनी नीट करायचे असल्याने कोचिंग क्लाससाठी अकोल्याला पाठविले होते. तोही यशस्वी झाला असून, सध्या मुंबई येथे जे.जे. महाविद्यालयात शिकत आहे. अक्षद आचले हा दहावी झाल्यानंतर नीटच्या तयारीसाठी अकोल्याला आला. अकरावी, बारावीसाठी प्रवेश घेतला. अकोल्यात त्यांनी खोली केली. आणि प्रा. ललित काळपांडे यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे अभ्यास करीत राहिलो. क्लास व्यतिरिक्त मी दररोज किमान सहा ते सात तास सातत्याने अभ्यास केला. लायब्ररीमध्येच मी अभ्यास करीत होतो. या दरम्यान शेकडो प्रश्नपत्रिका मी सोडवल्या. विशेष म्हणजे दोन वर्षांच्या काळात गावाला जाणे, तिकडे काही काळ राहणे, असे दिवाळी वगळता कधी झाले नाही. प्रा.ललित काळपांडे सरांना माझ्यावर विश्ववास होता की माझा निकाल चांगला येईल. त्यांचा विश्ववास सार्थ करण्यासाठी मी सुद्धा अभ्यासामध्ये कोणतीच कसर ठेवत नव्हतो. निकाल आल्यानंतर आणि त्यातही मी माझ्या अनुसूचित जमाती (एसटी) गटातून राज्यातून पहिला आल्याची बातमी ऐकताच आनंद गगनात मावत नव्हता. आई-वडीलही खूष झाले आहेत. माझी आधीपासूनच डॉक्टर होण्याची त्यातही बालरोग तज्ज्ञ होण्याची इच्छा असून, अंतिम निर्णय अभ्यासक्रमा दरम्यान घेणार असल्याचेही अक्षद आचले म्हणाला. कठोर परिश्रमाने अक्षदने आपली गुणवत्ता सिद्ध करीत जीवशास्त्र ३४६, रसायनशास्त्र १५४ आणि भौतिकशास्त्रात ९७ असे एकूण ५९७ गुण मिळवले आहेत.

जिद्द, चिकाटी अन् सातत्य; हीच यशाची त्रिसूत्री..
डॉक्टर व्हायचे ही जिद्द उराशी बाळगून, त्यानुसार चिकाटीने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि सातत्यपूर्ण अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. हीच यशाची त्रिसूत्री आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अक्षद आचले आहे. तो एस.टी. गटातून राज्यात पहिला व ऑल इंडिया (देशात) दहाव्या रैंकमध्ये आल्याने आनंद आहे. इतर विद्यार्थ्यांनी त्याच्यापासून प्रेरणा घेत आपले ध्येय गाठावे.
प्रा. ललित काळपांडे