
नागपूर, दि.21-मातीत घडणारी माणसे हीच शास्त्रज्ञ,वैज्ञानिक, खेळाडू आणि संत घडल्याची उदाहरणे आपल्या समोर आहेत. महत्वाचे म्हणजे ही माणसे आपल्यातीलच आहेत. भारत हा तरुणांचा देश आहे. निम्मी लोकसंख्या ही 25 वर्षे वयोगटातील तर 65 टक्के लोकसंख्या ही 35 वयोगटातील आहे. या तरूण भारतात 80 समाज हा कष्टकरी शेतकरी समाज असून या जनसामान्यांच्या पोरांना योग्य शिक्षण मिळत नाही. प्राथमिक शिक्षणात भेदभाव निर्माण केला जात असून संविधानातील तरतूदींचे पालन केले गेले असते तर आज 70 वर्षानंतर युवकांचे अधिवेशन घेण्याची गरज पडली नसती, असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी नागपूर येथे बोलताना केले.
ते नागपूर येथे धनवटे नॅशनल कॉलेजमधील डॉ. भाऊसाहेब देशमुख सास्कृतिक सभागृहात आयोजिक ओबीसी विद्यार्थी आणि युवक यांच्या महाअधिवेशनातील दुसऱ्या सत्रात बोलत होते.
द्वितीय सत्र समारोपाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर होते.यावेळी वक्ते म्हणून गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा़ शेषराव येलेकर, कु.मेघा सुरेश रामगुंडे,अतुल लोंढे, प्रमोद मानमोडे, दिनेश दादापाटील चोखारे,मुबंईचे माधव कांबळे,शकिल पटेल,निलेश कोढे,रुचीत वांढरे यांच्यासह इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या देशात आजही चुकीचे शिक्षण दिले जात आहे. शिक्षणात मानव थिअरीचा अभाव असून जान्हव थिअरीचा प्रभाव आहे. त्यामुळे योग्य ज्ञानापासून आपण वंचित आहोत. एकीकडे आपण बळिराजाला मानतो तर दुसरीकडे आपण त्याच बळिराजाची हत्या करणाऱ्या वामनाची पुजा करतो, हीच खरी विंडबना आहे. हे कसले विचार आपल्यावर लादले जात आहेत. फुले दाम्पत्यांनी दलितांसाठी शाळा सुरू केली असे लिहून ठेवले आणि तेच आजही शिकवले जाते. पण आपण आज सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. गांधीजींची हत्या एका माथेफिरूने केली असे भासवले जाते,मात्र त्याची जात प्रामुख्याने लपविली जाते, याचा आपण विचार करण्याची गरज आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना कु.मेघा रामगुंडे म्हणाल्या की, समाजातील युवकांनी आता पुढे आले पाहिजे. विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये आपल्या संत्याचे विचार मांडण्यासाठी आपल्या विद्वत्तेचा वापर करावा लागणार आहे. जयपराजयाचे कारण आपणच असतो. कौशल्य असेल तर आरक्षणाची गरज पडणार नाही. भारतीय संसद या वक्ते तयार करणाऱ्या ठिकाणी आरक्षणाने नव्हे तर गुणवत्तेच्या आधारे निवड झाली पाहिजे. गरिबीत मेलात तर तुमची चूक आहे, तुमच्या आईवडीलांची नाही. मुलगा मुलगी भेदभाव करू नका. युवकांमध्ये कौशल्य आहे. त्याला त्या त्या क्षेत्रात पुढे येऊ द्या, असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
माधव कांबळे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, जोपर्यंत आपल्या महापुरुषांचा शेवट आपल्याला कळणार नाही, तोपर्यंत आपल्याला ही लढाई कळू शकणार नाही. गेल्या 70 वर्षापासून आपण मागतच आलो आहोत. म्हणून आता मागणे सोडून हिसकावून घेण्याला पर्याय नाही.शकिल पटेल विचार व्यक्त करतांना म्हणाले की आम्ही मुस्लीमही ओबीसी मध्ये येतो.राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मुस्लीम ओबीसींना सोबत घेतले तर देशातील चित्र बदलून जाईल आणि आपल्याला न्याय हक्कासाठी अधिक काळ संघर्ष करण्याची गरज राहणार नाही असे विचार व्यक्त केले.अतुल लोंढे यांनी ओबीसींची नेहमीच फसवणूक केली जात असून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून ओबीसींना जागृत करुन संघटित करण्याचे काम जे सुरु झाले आहे ते नक्कीच या समाजासाठी भविष्यात फलदायी राहणार अशा आशावाद व्यक्त केला.यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात सचिन राजुरकर यांनी पुढचे अधिवेशन मुंबई येथे होणार असून त्यासाठी सर्वांना कामाला लागण्याचे आवाहन करीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 18 मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पोस्टाद्वारे सर्वांनी पाठवावे असी विनंती केली.संचालन आकाश जावळे याने केले तर आभार उज्वल्ला महल्ले हिने मानले.