विविध उपाययोजनांचा प्रभावीपणे अवलंब करुन मत्स्य उत्पादनातील अडचणी दूर करा – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

0
40

मुंबई, दि. 11 : राज्यामध्ये लहान तळी, तलाव तसेच इतर जलाशयाचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून मत्स्य व्यवसाय विकासासाठीचे हे राज्याचे बलस्थान आहे. मत्स्य उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने व रोजगार निर्मितीची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करुन या बलस्थानांचा प्रभावी मार्गाने अवलंब करावा, असे निर्देश मत्स्य व्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या विविध योजनांचा आढावा मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयात राज्यमंत्री श्री.भरणे यांनी घेतला. यावेळी मत्स्यव्यवसाय विकास आयुक्त अतुल पाटणे, कृषी व पदुम (मत्स्य) विभागाचे उपसचिव श्रीनिवास शास्त्री, सहआयुक्त राजेंद्र जाधव, उपआयुक्त मु.आ. चौगले, कोकण विभागाचे उपआयुक्त महेश देवरे, कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. भरणे म्हणाले, राज्यात कोळंबी बीजाला व मत्स्यबीजाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु, पुरवठा करण्यातील अडचणी दूर करुन मत्स्य उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी  तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश श्री.भरणे यांनी दिले.

मत्स्यबीज उत्पादन व संर्वधन केंद्रांची सद्यस्थिती, एकूण मत्स्यबीज केंद्र, मत्स्यबीज संवर्धन केंद्र, कोळंबी बीज उत्पादन केंद्र, कोळंबी बीज संवर्धन केंद्रांचा आढावा तसेच मत्स्यव्यवसाय विकास विभागातील रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आदींबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.