एसटी महामंडळाचे परिपत्रक जारी,निलंबनाची कारवाई मागे

0
48

मुंबई:-एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवरची कारवाई मागे घेण्याबाबत अखेर एसटी महामंडळाने परिपत्रक काढले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेली निलंबनाची तसेच बदली याबाबतची कारवाई मागे घेण्याबाबत एसटी महामंडळाने परिपत्रक काढलय.

👉👉या पत्रकानुसार जे कर्मचारी रुजू होवू इच्छितात त्यांना तत्काळ कामावर रुजू करून घेण्याचे आदेश देण्यात आलेत. ज्या कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, ज्यांची निलंबनाची कारवाई किंवा कारवाईची नोटीस देण्यात आली, ती मागे घेण्यात आली आहे.मात्र बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ दिलासा मिळणार नाही. बडतर्फ कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाच्या नियमानुसार अपील करावयाचे आहे. ज्या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी अपील केलेले आहे त्यांच्याबाबत चार आठवड्यात प्रकरण निकाली काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना प्रशासनाने परिपत्रकाच्या आधारे दिला आहे. मात्र संपकाळातील वेतन त्यांना मिळणार नसल्याचे यापैकी पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच 22 एप्रिल नंतर कामावर हजर न होणाऱ्या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचेही आदेश याद्वारे देण्यात आले आहे.

👉👉परिपत्रकातील महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे,

➖1. मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या उपरोक्त आदेशाच्या अनुपालनार्थ खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. आपल्या विभाग / घटक / आगारातील संपामध्ये सहभागी असणारे जे कर्मचारी दि. 22 एप्रिल रोजी किंवा तत्पूर्वी हजर होतील त्यांना तात्काळ रुजू करुन घेण्यात यावे.

➖2. तसेच ज्या कर्मचाऱ्यांवर शिस्त व आवेदन कार्यपध्दती अंतर्गत निलंबनाची कारवाई झालेली आहे, असे कर्मचारी दिनांक 22 एप्रिल रोजी किंवा तत्पूर्वी कर्तव्यावर रुजू होतील, त्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे.

➖3. तसेच ज्या कर्मचाऱ्यांवर शिस्त व आवेदन कार्यपध्दती अंतर्गत रा.प. महामंडळाच्या सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशा स्वरुपाची कारणे दाखवा नोटीस दिलेली असेल असे कर्मचारी दि. 22 एप्रिल रोजी किंवा तत्पूर्वी कामगीरीवर रुजू झाल्यानंतर त्यांना देण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस तात्काळ मागे घेण्यात यावी.

➖4. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित न करता आरोपपत्र देऊन बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे, ते कर्मचारी दिनांक 22 एप्रिल रोजी किंवा तत्पूर्वी कामावर रुजू झाल्यानंतर त्यांना देण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस तात्काळ मागे घेण्यात यावी.

➖5. संपकालावधीत संपात सहभागी कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, ते कर्मचारी दिनांक 22 एप्रिल रोजी किंवा तत्पूर्वी हजर होतील त्यांच्या बदल्या रद्द करुन त्यांना बदलीपूर्वीच्या ठिकाणी हजर करुन घेण्यात यावे.

➖6. ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत, ते दिनांक 22 एप्रिल रोजी किंवा तत्पुर्वी हजर झाल्यास त्यांची सेवासमाप्ती तात्काळ रद्द करण्यात यावी. मात्र त्यांना मागील कालावधीचे वेतन देण्यात येऊ नये.

➖7. आपल्या विभाग / घटक / आगारातील संप कालावधीमध्ये ज्या कर्मचा-यांना शिस्त व आवेदन कार्यपध्दती अंतर्गत रा.प.महामंडळाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आहे व ज्या कर्मचाऱ्यांनी प्रथम आवेदन सादर केले आहे, त्यांचे प्रथम आवेदन या आदेशापासून 4 आठवडयांच्या आत ताकीद देऊन निकाली काढण्यात यावे व त्यांना रा.प.सेवेत सेवेच्या सलगतेसह पुनःस्थापित करण्यात यावे. मात्र त्यांना मागील कालावधीचे वेतन देण्यात येऊ नये. ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप प्रथम आवेदन सादर केले नाही त्यांना प्रथम आवेदन सादर करण्यासाठी तीन आठवडयांची मुदत असेल. प्रथम आवेदन दाखल झाल्याच्या दिनांकापासून पुढील चार आठवडयांच्या आत सादर करावे आणि प्रथम आवेदन ताकीद देऊन निकाली काढण्यात यावे व त्यांना रा.प. सेवेत सेवेच्या सलगतेसह पुनःस्थापित करण्यात यावे. मात्र त्यांना मागील कालावधीचे वेतन देण्यात येऊ नये. तसेच जे कर्मचारी वर दिलेल्या विहित मुदतीत प्रथम आवेदन सादर करणार नाहीत, त्यांना रा.प. सेवेत स्वारस्य नाही असे समजण्यात येईल व त्यांचे बडतर्फीींचे आदेश अंमलात येतील.

➖8. जे कर्मचारी मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दि. 22 एप्रिल रोजी पर्यंत हजर होणार नाहीत ते त्यांचेविरुध्द रा.प. महामंडळातील शिस्त व आवेदन कार्यपध्दतीनुसार कारवाईस पात्र ठरतील.

➖9. ज्या कर्मचाऱ्यांविरुध्द संपकालावधीत गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांनी दिनांक 22 एप्रिल रोजी किंवा तत्पुर्वी हजर होण्याची इच्छुकता दर्शविल्यास त्यांना …
संपकरी कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाकडूनच फसवणूक;👉👉एसटी कर्मचारी संघटनांकडून हल्ल्याच्या घटनेचा निषेध

मुंबई :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध एसटीतील कर्मचारी संघटनांनी नोंदविला असून संपकरी कर्मचाऱ्यांची नेतृत्वाकडूनच फसवणूक झाल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.विलीनीकरण, सातव्या वेतन आयोगाचे लाभ मिळवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी संपाचे नेतृत्व करणाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्याचा प्रकार असल्याचे मत संघटनांनी नोंदविले आहे.

👉गेल्या पाच महिन्यांपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. त्यावेळी विलीनीकरण होणार असे सांगून कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्यात आली. मनमानी पद्धतीने व इतरांचा द्वेश करून संपकरी कामगारांना त्यांच्या नेत्यांनी फसवले, असा आरोप मान्यताप्राप्त स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे संदीप शिंदे यांनी केला आहे. काल न्यायालयाचा निकाल आला त्याचे स्वागत करून गुलाल उधळला गेला, पण प्रत्यक्ष निकाल हातात आल्यावर कामगारांना नेतृत्वाकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. विलीनीकरण, सातव्या वेतन आयोगाचे लाभ या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, पाच महिन्यांचा पगारही नाही हे अपयश लपवण्यासाठी कामगारांना भडकवण्यावत आल्याचेही शिंदे म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याच्या घटनेचाही आम्ही निषेध करत असल्याचे सांगितले.

👉महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणी श्रीरंग बरगे यांनीही हल्ल्याच्या घटनेचा निषेध केला. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. कोरोना कालावधीत मृत्यू पावलेल्या दहा कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख व ९१ कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख रुपये यापूर्वीच देण्यात आले आहेत. काही प्रमाणात वेतनात वाढही झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयात याच सर्व बाबी आल्या आहेत. या सर्व बाबी न्यायालयाच्या निर्णयापूर्वी मान्य करण्यात आल्या आहेत असे सांगून अपयश लपविण्यासाठी नियमबाह्य कृती सुरू असल्याची टीका त्यांनी केली.