Home महाराष्ट्र क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अलौकिक कार्य, विचार पुढच्या पिढीपर्यंत...

क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अलौकिक कार्य, विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करुया – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 11 :- “क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनी बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त केले. स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अनिष्ट रुढी-परंपरांवर हल्ला करुन प्रबोधनाची चळवळ उभारली. क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोघांचे कार्य अलौकिक असून त्यांचे कार्य आणि विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा निर्धार क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज करुया,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोघांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन त्यांना अभिवादन केले.

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव जे.जे. वळवी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

शेतकरी, कष्टकरी, महिला, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना हक्कांची जाणीव करुन देत लढण्याचे बळही दिले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली. देशाला पुढे नेणारा, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्रांती घडवून आणणारा विज्ञानवादी, सत्यशोधक विचार त्यांनी दिला. महिला आज समाजाच्या अनेक क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरत आहेत, महत्त्वाच्या पदांवर जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, त्याचे श्रेय क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या त्यागाला आहे. त्यांच्या प्रगत, पुरोगामी, सत्यशोधक विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल सुरु असून पुढेही सुरु राहील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार पुढे घेऊन जाण्यासाठी राज्यातील जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि. 11 : महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, राजेश तारवी, अवर सचिव (समिती) सुरेश मोगल, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने, उपसभापती, विधानपरिषद यांचे विशेष कार्य अधिकारी अविनाश रणखांब यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा फुले यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. ११:- भारतीय समाजक्रांतीचे प्रणेते, थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीमुळेच आजच्या आधुनिक भारताचा पाया घातला गेला. सत्यशोधक चळवळ, लोकशिक्षण, महिला शिक्षण यासाठी महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्य वेचले. शोषित-वंचितावरील अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. समाजातील अनिष्ट रूढी, प्रथांना त्यांनी कडाडून विरोध केला. ब्रिटिश राजवटीलाही त्यांनी खडे बोल सुनावले. उद्योग, व्यवसाय आणि शेतीच्या क्षेत्रांतील यशस्वी अशा कामांनी त्यांनी उद्यमशीलतेचा संदेश दिला. पुरोगामी महाराष्ट्राच्या समताधिष्ठित वाटचालीत महात्मा फुले यांचे अमूल्य असे योगदान आहे. राज्यकारभार, जनकल्याण याबाबत महात्मा फुले यांनी घालून दिलेले धडे आजही मार्गदर्शक आहेत. त्यानुसारच आपली वाटचाल सुरू आहे. महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Exit mobile version