शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार:संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, म्हणाले- राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवणं घटनाबाह्य!

0
34

मुंबई,दि.29ः- राज्यातील सत्तानाट्यातील चुरस आता शिगेला पोहोचली आहे. भाजपने काल पत्र दिल्यावरून राज्यपालांनी दखल घेतली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले. यासाठी उद्या म्हणजेच 30 जून रोजी विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे. याविरुद्ध आता शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार असून पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हे स्पष्ट केलं आहे.

राजभवन आणि भाजपकडून मिळून घटनेची पायमल्ली

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, सोळा आमदारांचा अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या दरम्यान ही अवैध कार्यवाही सुरू आहे. राजभवन आणि भाजप एकत्र मिळून घटनेची पायमल्ली करत आहेत, अशा वेळी देशातील सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि न्यायाची विनंती करू.

जेटपेक्षाही वेगाने निर्णय

राऊत पुढे म्हणाले की, जेटपेक्षाही जास्त वेगाने, राफेलचा वेगही कमी पडेल एवढ्या वेगाने हे घडतंय. आमच्या महाविकास आघाडीतील ज्या बाबी आहेत त्या आम्ही बघून घेऊन, पण तुम्ही भाजप पडद्यामागून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, पण हे एवढं सोपं नाही. जनता सर्वकाही पाहत आहे, जनता गप्प नाही. राजकीय अस्थिरता कोणी निर्माण केली आहे. 12 विधान परिषद आमदारांची नॉमिनेशनसाठी फाइल आम्ही अडीच वर्षांपासून पाठवलेली आहे, त्यावर निर्णय नाही. ते पुढे म्हणाले की, त्या आमदारांचं पर्यटन सुरू आहे, गोव्यातून मुंबईत येतील, तिथेही डोंगर, नदी, हॉटेल पाहतील. पाहू द्या त्यांना. 70 खोल्या गोव्यात बुक केल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, पैसा आहे त्यांच्याकडे करू द्या.

पहिल्या दिवसापासून मविआ सरकार पाडण्यासाठी फडणवीसांचे प्रयत्न

राऊत पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका हे सरकार पाडण्याचीच आहे, त्यांना असं वाटत असेल की, त्यांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण आला आहे, तर त्यांना शुभेच्छा. राज्यपालांनी विशेष अधिवेशनासाठी दिवस निश्चित केलेला आहे, 12 आमदारांची फाइल पेंडिंग असताना काल एक पत्र जातं आणि ताबडतोब अधिवेशनाचा दिवस ठरवला जातो, एवढा वेग.

हे घटनाबाह्य आहे

राऊत म्हणाले की, मुळात असं विशेष अधिवेशन बोलावता येतं का, हाच प्रश्न आहे. आमच्या दृष्टीने 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय प्रलंबित आहे. तोपर्यंत असं अधिवेशन बोलवता येत नाही. राजभवनाकडून घटनेची पायमल्ली ही अतिशय गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांपासून सर्वांना वाटतंय की, हे घटनाबाह्य आहे. आमचे अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत हे यात लक्षात घालत आहेत. उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घातल्यावर शिंदेंनी प्रवक्त्यांवर म्हणजे तुमच्यावर बोट ठेवल्याच्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत आहे. त्यांना ते खटकत असेल तर मी आजपासून बोलायचं थांबतो. ते आजही आमचे मित्र आहेत. त्यांनी आजही यावं, बोलावं. पण मी बोलतोय किंवा आदित्य ठाकरे बोलत आहेत म्हणून यायला नकार द्यायचा हा बालिशपणा असल्याचं ते म्हणाले.

बहुमत चाचणीतही आम्हीच विजयी होऊ..

राऊत म्हणाले की, बहुमत चाचणीच्या वेळी कायद्याचं पालन झालं तर आम्ही निश्चितच विजयी होऊ हा आमचा विश्वास आहे. आम्ही काही चूक केली नाही, आम्ही काही पाप नाही केलं, आम्ही त्यांना मित्रासारखं सांभाळलं आहे. ते जे कारणं देत आहेत, ती सर्व खोटी आहेत, असंही राऊत म्हणाले.